मुंबई | Mumbai
बेळगाव दौरा करुन कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये पोहोचल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय भूवया उंचावल्या आहेत. बेळगाव आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात असलेल्या निटूर इथल्या नृसिंह जयंती आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ संदर्भात वक्तव्य केलय…
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी कोल्हापुरात बोलताना ‘मी पुन्हा येईन’ असं पुन्हा म्हटले आहे. बेळगाव दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये भगवान श्री नृसिंह मंदिरात देवेंद्र फडणवीसांनी दर्शन घेतलं. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना फडणवीसांनी हे विधान केलं आहे.
“पाटीलसाहेब, तुम्हाला एवढंच सांगतो की इथे एकदा येऊन मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये की जेव्हा मी सांगतो मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्की येतो. कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे. आपलं कुलदैवतच नरसिंग आहे. आपण कुठूनही प्रगती करतो”,असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक : शरद पवार अध्यक्षपदी कायम राहणार की नवा चेहरा मिळणार?
एकीकडे शरद पवार (Sharad Pawar) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तर काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये भावी मुख्यमंत्री फडणवीस असे बॅनर झळकले होते. तसेच, त्यांच्यापूर्वी धाराशिव येथे अजित पवार (Ajit Pawar) यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. त्यामुळे राज्यात सत्तापालट होणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.