
मुंबई | Mumbai
देशातील अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे तो भाजपा विरोधी आहे. त्यामुळे असाच ट्रेंड कायम राहिला तर २०२४ मध्ये देशाचे चित्र बदलले दिसेल असे वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले आहे. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रत्युत्तर देत शरद पवारांना टोला लगावला आहे...
फडणवीस म्हणाले की, "ट्रेंड बदलण्याची स्वप्नं पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीतही स्वप्न पाहिली. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत. तसेच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका (Elections) आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे असे म्हणत आहेत. मात्र, मोदींविरोधी वातावरण कुठे आहे? ३०० पेक्षा जास्त लोक निवडून आले तरीही मोदींविरोधी वातावरण दिसत आहे. निवडणुकाजवळ आल्या आहेत. त्यामुळे ते बोलत आहेत" असे त्यांनी म्हटले.
तसेच गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात (Maharashtra) दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे, असे शरद पवार म्हणाले होते. त्यावरही फडणवीसांनी भाष्य केले असून विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यावर संशय व्यक्त केला आहे. यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्हाला काही गोष्टी समजत आहेत. पण सगळी चौकशी झाल्यानंतर मी त्यातील बाबी सांगेन. पण अचानकपणे अशाप्रकारे वेगेवगळ्या जिल्ह्यात औरंगजेब आणि टिपू सुल्तानचे उदात्तीकरण होणे हे काही सहज होत नाही. हा योगायोग नाही. त्यातून विरोधी पक्षाच्या लोकांनी वारंवार दंगली घडवण्याचा प्रयत्न आहे म्हणणं, त्यानंतर विशिष्ट समाजाकडून औरंगजेबाचे उदात्तीकरण होणे हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे याच्या खोलात जावं लागेल," असा इशाराच देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.