
मुंबई | Mumbai
ड्रग्ज माफिया आणि पुण्यातील ससून रुग्णालयातून (Sassoon Hospital) फरार झालेल्या ललित पाटीलला (Lalit Patil) मुंबई पोलिसांनी (Mumbai Sakinaka Police) तामिळनाडू येथून अटक केली. त्यानंतर ललित पाटीलला अंधेरी सेशन्स कोर्टात (Court) हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला पाच दिवसांची म्हणजेच सोमवार (दि.२३ ऑक्टोबर) पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली आहे. मात्र, ललित पाटीलच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. त्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे....
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, "आम्ही पोलिसांना ड्रग्जच्या (Drugs) रॅकेटवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस दलाचे सर्व युनिट कामाला लागले आहेत. याच दरम्यान, मुंबई पोलिसांना नाशिकमधील (Nashik) ड्रग्जच्या कारखान्याची माहिती मिळाली. त्या कारखान्यावर पोलिसांनी धाड टाकली. वेगवेगळ्या ठिकाणी जे लोक असे काम करतात त्यांच्यावरही धाड टाकण्यात आली. त्यानंतर आता ललित पाटील हातात आला असून त्यातून निश्चितपणे एक मोठं ड्रग्जचे जाळे बाहेर येईल. काही गोष्टी ज्या मला आत्ता समजल्या आहेत त्या मी लगेच माध्यमांना सांगू शकत नाही. मी योग्यवेळी सांगेन. पण एवढंच सांगतो की, या कारवाईतून आम्ही एक मोठं ड्रग्जचं जाळं उघड करू," असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
तर ललित पाटीलच्या "मी पळालो नाही, मला पळवलं आहे" या वक्तव्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ते सगळंच बाहेर येणार आहे. पोलिसांच्या या कारवाईतून एक मोठं जाळं बाहेर येणार आहे. तसेच बोलणाऱ्या अनेकांची तोंडं बंद होणार आहेत. आता ललित पाटील सापडल्यानंतर तो काय बोलतो यापेक्षा जे ड्रग्जचं जाळं बाहेर येणार आहे त्यावरून अनेकांची तोंडं बंद होणार आहे," असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच ससून रुग्णालयावर गुन्हेगारांच्या मुदती वाढवून देण्यात आल्याचा आणि चुकीची प्रमाणपत्रे तयार करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या आरोपांची चौकशी सुरू आहे. कुणालाही सोडणार नाही. सर्व दोषींवर कारवाई केली जाईल," असेही फडणवीसांनी नमूद केले.
दरम्यान, ललित पाटीलला मुंबईच्या साकीनाका पोलिसांनी तामिळनाडू येथून काल रात्री उशीरा ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला मुंबईत (Mumbai) आणण्यात आले. यानंतर सकाळी कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. याठिकाणी माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर त्याने आपण ससूनमधून पळून गेलो नव्हतो तर आपल्याला पळवलं गेलं होतं असा खळबळजनक आरोप केला. त्यामुळे आता यामागे नेमका कुणाचा हात आहे याची चर्चा सुरु झाली आहे.