
मुंबई | Mumbai
एरव्ही अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप होत असतात. मात्र, आज विधानसभेत (Legislative Assembly) लग्नाच्या विषयावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आदित्य ठाकरेंना चिमटा काढला. त्यामुळे सभागृहातले सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरचे आमदार (MLA) खळखळून हसतांना पाहायला मिळाले...
सभागृहामध्ये आज आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रकल्प बंद झाल्यामुळे कामगार रस्त्यावर येत असल्याचा विषय मांडताना कामगारांच्या लग्नावरून प्रश्न उपस्थित केला. यावेळी ते म्हणाले की, राज्यभरात २५ ते ३० टक्के प्रकल्प बंद होतात. त्यामुळे कामगार रस्त्यावर येतात. हे होऊ नये म्हणून आपण काही धोरण आखले पाहिजे की नाही? एखादा मोठा प्रकल्प होतो तेव्हा कामगार गाव सोडून येतात. प्रकल्प बंद पडल्यावर तो कामगार कुटुंबासह रस्त्यावर येतो. हे टाळण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहे. लग्न कामगार आहे म्हणून केलं, आता लग्न तुटलं त्याला कोण जबाबदार आहे? असा प्रश्न कडूंनी विचारला. सरकारने (Government) जबाबदारी घ्यावी असे देखील कडू म्हणाले.
त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बोलायला उभे राहिले, लग्न लावून देण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि तुटलं तरी त्याची जबाबदारी ही सरकारची आहे, पण तुम्ही प्रश्न केला तो तपासून पाहिला जाईल. पण तुम्ही हा प्रश्न आदित्य ठाकरे यांच्याकडे बघून विचारला का, असा मिश्किल चिमटा फडणवीस यांनी काढला. त्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला.
यानंतर आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) बोलण्यास उभे राहिले आणि त्यांनी फडणवीसांच्या कोपरखळीवर विनोदी शैलीत पलटवार केला. ते म्हणाले की, 'ही काही राजकीय धमकी आहे का, की लग्न लावून देतो, नाहीतर आमच्या सोबत बसा' असे म्हणत आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिले. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) आदित्यजी आधी लगीन कोंढाण्याचे असे म्हटले. यानंतर पुन्हा एकदा सभागृह खळखळून हसले.
त्यावर पुन्हा फडणवीस बोलतांना म्हणाले की, कुणाचंही तोंड बंद कसं करायचं याचा उत्तम उपाय म्हणजे लग्न. मी अनुभवावरूनच बोलतो आहे. सन्मानीय आदित्य ठाकरेंनी मांडलेले विषय महत्त्वाचे आहेत त्याची दखल आम्ही घेऊ. त्यांच्या सूचना योग्यच आहेत. अॅश मोठ्या प्रमाणावर तयार होते त्याच्या वाहतुकीला आम्ही परवानगी देत आहोत” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. पण सरकार लग्नाची जबाबदारी घेईल असं जेव्हा फडणवीस म्हणाले तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.