
मुंबई | Mumbai
गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (Shiv Sena and NCP) या दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये पडलेल्या फुटीमुळे राज्याच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. या दोन्ही पक्षांमधील अंतर्गत फुटीनंतर महाराष्ट्रात भाजप, शिंदे गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाने (Ajit Pawar Group) एकत्र येत राज्यात महायुतीचे (Mahayuti) सरकार स्थापन केले आहे. मात्र, अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रीपद जाणार आणि त्यांच्याऐवजी अजित पवार मुख्यमंत्री होणार अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत...
अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच (Eknath Shinde) आहेत आणि यापुढेही तेच राहतील असे स्पष्ट करत २०१९ मध्ये महाराष्ट्रात (Maharashtra) राष्ट्रपती राजवटीची (President's Rule) कल्पना शरद पवार यांची होती, असे म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे. तसेच अजित पवार सोबत आले तेव्हा शरद पवारांची नेमकी काय भूमिका होती, याबाबतही स्पष्टीकरण दिले आहे. ते मुंबईमध्ये (Mumbai) आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले की, "मला हे स्पष्ट करायचे आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत आणि यापुढेही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील. लोकसभा (Lok Sabha) असो की, विधानसभेच्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील. महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलणार आहेत हे तुम्ही मनातून काढून टाका. मुख्यमंत्री बदलणार नाहीत, बदलणार नाहीत," असे फडणवीस यांनी सांगितले. तसेच "मीही वकील आहे. एक वकील असल्याने मी तुम्हाला सांगतो की, शिवसेना (शिंदे गट) प्रकरणी अध्यक्षांपुढेही शिंदे गटाची बाजू अधिक मजबूत आहे. शिंदे यांच्या अपात्रतेच्या बातम्या शरद पवार किंवा ठाकरे यांच्या गटाकडून वारंवार पसरवल्या जातात. सुप्रीम कोर्टात (Supreme Court) ठाकरे गटाविरुद्धचा (Thackeray Group) खटला एकनाथ शिंदे गटच जिंकणार आहे", असा विश्वासही यावेळी फडणवीसांनी बोलतांना व्यक्त केला.
तर २०१९ च्या महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीबद्दल बोलतांना फडणवीस म्हणाले की, "२०१९ मध्ये शिवसेनेने आमचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीशी बोलणी सुरू केली. तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी बोलावले जात असल्याचे लक्षात आले. त्यावेळी राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला त्रिपक्षीय सरकार नको असल्याने आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो, असा प्रस्ताव दिला. त्यानंतर शरद पवार यांची भेट घेतली. आम्ही भाजपसोबत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याची जबाबदारी माझ्यावर आणि अजित पवारांवर टाकण्यात आली. आम्ही पोर्टफोलिओ, जिल्हे याबाबत निर्णय घेतला, त्या प्रक्रियेत राष्ट्रपती राजवट लावण्याचे ठरले आणि त्यानंतर शरद पवारांनी आपला निर्णय बदलला. हे योग्य नाही, असे अजित पवारांना वाटले. त्यामुळेच आम्ही भाजपसोबत (BJP) जाणार असल्याचे त्यांनी (अजित पवार) सांगितले, असे फडणवीस म्हणाले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, २०१९ मध्ये झालेला हा करार अजित पवारांशी नसून शरद पवार यांच्याशी झाला होता. शरद पवार यांच्यासोबत हा निर्णय झाला. अजित पवार यांनी अधिकृत केल्यानंतरच आम्ही त्यांच्यासोबत बसलो. शरद पवार नवनवीन गोष्टी सांगतात. मी सत्य सांगतो. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची कल्पना शरद पवार यांची होती. मी इतक्या लवकर यू-टर्न घेऊ शकत नाही, असे शरद पवार म्हणाले. तुम्ही राष्ट्रपती राजवट लावा. त्यानंतर मी महाराष्ट्राचा दौरा करेन आणि त्यानंतर महाराष्ट्राला स्थिर सरकार हवे, त्यामुळे आम्ही भाजपसोबत जात आहोत, अशी भूमिका मी घेणार आहे. तसेच जेव्हा राष्ट्रपती राजवट लागू केली जाते तेव्हा सर्व पक्षांना सरकार स्थापन करण्यासाठी पत्र (Letter) दिले जाते. तसे पत्र राष्ट्रवादीलाही दिले होते. आम्ही सरकार स्थापन करणार नाही, असे पत्र आमच्या घरी टाईप केले होते, त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती, असेही फडणवीसांनी म्हटले.