
मुंबई | Mumbai
राज्यात कंत्राटी पोलीस भरतीवरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली. तसेच पोलीस विभागाच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (२० ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेत मोठा निर्णय जाहीर केला. यानुसार शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील कंत्राटी भरतीचा जीआर रद्द केला आहे.
जे काही कंत्राटी भरतीचे जीआर निघाले ते काँग्रेस, राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडी सरकारनेच काढले असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मी चर्चा केली. आधीच्या सरकारचं पाप आपण का उचलायचं. त्या सरकारने केलेले कंत्राटी भरतीचे जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाप त्यांनी करायचं आणि आमच्या माथ्यावर फोडायचं वरून आंदोलन करायचं. हे आम्हाला मान्य नाही असं म्हणत थेट उद्धव ठाकरे यांना फडणवीस यांनी प्रश्न विचारला. आम्ही जीआर रद्द केल्यानंतर काँग्रेस, उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रावादी काँग्रेस माफी मागणार का? युवकांची फसवणूक केल्याबद्दल माफी मागणार नसेल तर आम्हाला सगळी कागदपत्रे जनतेपर्यंत नेऊ अशा शब्दात विरोधकांना फडणवीसांनी इशारा दिला.