
नाशिक | निशिकांत पाटील | Nashik
आपले म्हणणे स्पष्ट शब्दांत आणि निर्भीडपणे मांडण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची (Nitin Gadkari) ख्याती आहे. देशाच्या राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणूनही त्यांचे नाव चर्चिले जाते. केंद्रात रस्ते वाहतूक आणि महामार्गसह अनेक महत्त्वपूर्ण खात्यांचा कार्यभार ते समर्थपणे सांभाळत आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. तथापि त्यांचा रोखठोकपणा आणि परखडबाणा त्यांच्या आगामी राजकीय प्रवासातील गतिरोधक ठरतो की काय; अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत...
अलीकडच्या काळात नितीन गडकरी यांनी विविध कार्यक्रमांतून व्यक्त होताना बिनधास्तपणे भाष्य केले आहे. त्यांची राजकीय भाष्ये चांगलीच गाजत आहेत. मला खूपवेळा राजकारण सोडावेसे वाटते. कारण आयुष्यात राजकारण सोडता इतर अनेक गोष्टी करण्यासारख्या आहेत, असे ते एकदा म्हणाले होते. मी अनेक वर्षार्ंपासून मंत्री, पण मला विमानतळावर घ्यायला कुत्रेही येत नाही, असे म्हणून त्यांनी पक्षातील नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबद्दल नुकतीच नाराजी प्रकट केली आहे.
गेल्या वर्षी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाच्या संसदीय समितीची पुर्नरचना केली. महत्वपूर्ण बदल करताना नितीन गडकरी यांना समितीतून वगळून त्यांना मोठा धक्का दिला. याउलट देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक समितीत समावेश करून त्यांचे महत्त्व वाढवण्यात आले आहे. गडकरी आणि फडणवीस हे दोघेही नेते भाजपचे निष्ठावंत समजले जातात. दोघेही नागपूरचे रहिवासी आहेत.
मात्र पक्षात सध्या दोघांना मिळणारी वेगवेगळी वागणूक बरेच काही सांगून जात आहे. राष्ट्रीय स्तरावर फडणवीसांचे महत्त्व वाढवून गडकरी यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. पक्षाचे सर्वोच्च धोरण ठरवणार्या संसदीय समितीतून वगळले जाणे हा गडकरी यांच्यासाठी भाजपकडून सूचक संदेश असल्याचे मानले जात आहे. पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमधून गडकरी यांना डावलल्याचेही दिसून आले. हळूहळू गडकरी यांच्या नेतृत्वाचे पंख छाटण्याच्या दिशेने पक्षाकडून पावले टाकली जात असावीत, असाही सूर निघत आहे.
गेल्या 45 वर्षांत मी कोणालाही खोटे आश्वासन दिलेले नाही. राजकारणात खोटे बोलण्याची गरज नाही, असे म्हणून गडकरी यांनी स्वपक्षीयांनाच आरसा दाखवला का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत मी माझे पोस्टर लावणार नाही, बॅनरही लावणार नाही, कोणाला चहा-पाणी करणार नाही, पण सेवा मात्र इमानदारीने करीन, असे गडकरी म्हणाले.
पत्रकारांना चहापान करा, त्यांना ढाब्यावर नेऊन जेऊ घाला, त्यांना खूश ठेवा, पक्षाविषयी विरोधी बातम्या येणार नाहीत याची काळजी घ्या, असे वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतेच केले. गडकरी यांनी व्यक्त केलेले मत बावनकुळे यांच्या त्या वक्तव्याला छेद देणारे असावे, अशीही चर्चा होत आहे.