'जिथे भाजपचे सरकार येत नाही तिथे...'; केजरीवालांचा निशाणा
मुंबई | Mumbai
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे सध्या मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असून काल त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आज केजरीवाल यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) वाय. बी. सेंटरमध्ये भेट घेतली. पवारांची भेट घेतल्यानंतर केजरीवालांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला...
यावेळी केजरीवाल म्हणाले की, २०१५ साली दिल्लीत (Delhi) आपचे (AAP) सरकार आल्यानंतर केंद्र सरकारने एक अध्यादेश काढून अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा दिल्ली सरकारचा अधिकार काढून घेतला. यासाठी आम्ही ८ वर्ष न्यायालयीन लढाई (Court Battle) लढलो. या लढाईमध्ये आम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये यश आले. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने ५-० ने आमच्या बाजूने निकाल दिला, तरीही केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टाच्या निकालाविरोधात अध्यादेश आणला आहे. लोकसभेमध्ये भाजपकडे (BJP) बहुमत आहे, पण राज्यसभेत त्यांच्याकडे आकडे नाहीत, त्यामुळे देशभरातल्या विरोधकांनी या अध्यादेशाविरोधात राज्यसभेत (Rajya Sabha) मतदान करावे, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली.
केजरीवाल पुढे म्हणाले की, जिथे भाजपचे सरकार येत नाही तिथे मात्र भाजप आमदारांना (MLA) फोडून, ईडी-सीबीआय पाठवून किंवा अध्यादेश आणून सरकारला त्रास दिला जातो. मात्र आता केंद्राने आणलेल्या अध्यादेशाला सर्व विरोधकांनी कडाडून विरोध केला पाहिजे. शरद पवार यांनी केंद्राच्या अध्यादेशाला विरोध करण्याची भूमिका घेतल्याने त्यांचे आभार मानतो, अशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी भावना व्यक्त केल्या.
राष्ट्रवादीचे आम आदमी पार्टीला समर्थन
दरम्यान, केजरीवालांच्या मागणीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी समर्थन देत म्हटले की, सध्या लोकशाहीवर आघात होत असून ही समस्या फक्त एका दिल्लीची नाही तर देशाची आहे. केजरीवाल समर्थन मागण्यासाठी आले असून त्यांना राष्ट्रवादीचा (NCP) पाठिंबा आहे. तसेच सध्या भाजपविरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असून यासंदर्भात आपण देशभरातल्या विरोधकांसोबत बोलू' असा विश्वास पवारांनी केजरीवालांना दिला.