नाशिक | प्रतिनिधी
२६ नोव्हेंबरला 'निवार' चक्रीवादळ शमल्यानंतर आता डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात 'बुरेवी' नावाचे चक्रीवादळ आले आहे. चक्रीवादळाला 'बुरेवी' हे मालदीवन या देशाने ठेवलेले नाव आहे....
यावर्षी आलेल्या 'अॅम्फन' आणि 'निसर्ग' या पहिल्या दोन चक्रीवादळांचा वेध घेण्यासाठी दिल्ली येथे एक उच्चस्तरीय तीन सदस्यीय कमिटी गठीत करण्यात आली. हवामान संशोधनातील उल्लेखनीय योगदानाची वरीष्ठ पातळीवर दखल घेत प्रा किरणकुमार जोहरे यांची त्यात अनौपचारिक निवड करण्यात आली आहे. चक्रीवादळांचा अचूक वेध घेण्यासाठी ते दिवसातील २२ तास काम करत भारत व जागतिक हवामानातील घटनांवर लक्ष ठेऊन निरीक्षण घेत असतात.
चक्रीवादळांचे विज्ञान!
हवामान खात्याचा अधिकृत मान्सून १ जूनला सुरू होऊन ३० सप्टेंबरला दफ्तरी संपतो. १५ आॅगस्ट २०२० ला महाराष्ट्रात मान्सून खऱ्या अर्थाने सुरू झाला व चार महिन्यानंतर म्हणजे १५ डिसेंबर २०२० ला तो संपेल असे आपले वैयक्तिक शास्त्रीय निरीक्षण असल्याचे हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
जेव्हा वातावरणात अस्थिरता निर्माण होते आणि वारे गोलाकार फिरु लागतात तेव्हा हवेत भवरे तयार होऊन चक्रीवादळ बनते. मान्सून परतत आहे याचे हे एक दर्शक परीणाम आहे. चक्रीवादळे ही दर्शक म्हणून देखील काम करतात. मान्सून पुर्व काळात आणि मान्सून संपतांना वातावरणातील अस्थिरतेने चक्रीवादळांची निर्मिती होते. आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये मान्सून परतण्यासाठी सुरुवात झाली आहे हे दर्शवितात असे ही ते म्हणाले.
मान्सून आणि चक्रीवादळांचा पॅटर्न बदलला!
सध्या मान्सून परतण्यास सुरुवात झाली आहे. मान्सून परतीचे ईशान्य मोसमी वारे आता वाहू लागले आहेत. याचा परीणाम म्हणून आता चक्रीवादळे निर्माण होण्याची सुरुवात झाली आहे. मान्सून परतत असतांना २०२० या वर्षी तयार झालेले 'निरव' हे पहिले चक्रीवादळ उठले होते. येत्या काळात अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात अजून चक्रीवादळे निर्माण होतील. यानंतर देखील डिसेंबर २०२० आणि जानेवारी २०२१ मध्ये चक्रीवादळे आणि त्यामुळे ठराविक कालावधीच्या पावसाचा आपल्याला अनुभव घ्यावा लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला.
दरवर्षी आॅक्टोबर व नोव्हेंबर मध्ये चक्रीवादळे निर्माण होतात. यावर्षी एकही चक्रीवादळ आॅक्टोबर मध्ये निर्माण झालेले नाही. नोव्हेंबरच्या शेवटी 'निवर' हे चक्रीवादळ बनले. अर्थात याचा सरळ सरळ नैसर्गिक अर्थ असा निघतो कि डिसेंबर आणि जानेवारी मध्ये अजून वादळांना आपल्याला सामोरे जायचे आहे.
तसेच गेल्या किमान २० वर्षापासून मान्सून पॅटर्न बरोबरच चक्रीवादळांचा पॅटर्न देखील बदलला. लक्षणीयरित्या चित्र बदलले ते सांगतात.
'बुरेवी' नंतर 'तौत्के'!
'बुरेवी' या चक्रीवादळांनंतर साधारणतः पुढील दोन आठवड्यात पुन्हा नवीन दुसरे चक्रीवादळ तयार होईल. 'तौत्के' या म्यानमारने ठेवलेले नावाने ते ओळखले जाईल. हे चक्रीवादळ अरबी समुद्रात निर्माण होईल की बंगालच्या उपसागरात यावर अद्याप अभ्यास सुरु असल्याचे जोहरे म्हणाले.
शेतकर्यांनी उगीच घाबरुन जाऊ नये!
बंगालच्या उपसागरात श्रीलंकेजवळ तयार झालेले हे चक्रीवादळ तमिळनाडूच्या किनारपट्टीवर दक्षिणेकडे धडकण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे तमिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक व तेलंगणा या राज्यात निश्चितपणे पाऊस होईल.
महाराष्ट्र या चक्रीवादळा पासून एक हजार तीनशे किलोमीटर पेक्षाही जास्त अंतरावर असल्याने तुरळक प्रमाणात पाऊसा व्यतिरिक्त महाराष्ट्रातील शेतीला 'बुरेवी' चक्रीवादळांचा सध्या तरी कुठलाही धोका नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरु नये.