दिल्ली | Delhi
देशात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात ७९ हजाराच्यावर रूग्ण आढळून आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार,
गेल्या २४ तासात १ हजार ०६९ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या २४ तासात ७९ हजार ४७६ रूग्ण आढळले आहे. देशातील एकूण करोना बाधितांची संख्या ६४ लाख ७३ हजार ५४५ इतकी झाली आहे. त्यातील आजपर्यंत ५४ लाख २७ हजार ७०७ रूग्ण करोनामुक्त झाले असून ९ लाख ४४ हजार ९९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आजपर्यंत १ लाख ८४२ रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
देशात मोठ्या प्रमाणात करोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. काल देशात एकूण ११ लाख ३२ हजार ६७५ करोना चाचण्या करण्यात आल्या. आतापर्यंत देशभरात ७ कोटी ७८ लाख ५० हजार ४०३ करोना चाचण्या करण्यात आल्याची माहिती ICMR कडून देण्यात आली.
दरम्यान भारतातील एकूण मृत्यूसंख्येत महाराष्ट्राचा सर्वाधिक वाटा आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत ३८ हजार रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील मृत्यूदरदेखील जास्त असून २.६७ टक्के इतका आहे. तामिळनाडू आणि कर्नाटकात प्रत्येकी नऊ हजारापेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत. राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत तेथील मृत्यूदर १.५ टक्के इतका आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात प्रत्येकी पाच हजारांहून जास्त मृत्यू झाले आहेत.
सर्वाधिक मृत्यूदर पंजाबमध्ये आहे. पंजाबमध्ये रुग्णसंख्या १ लाख १५ हजार असून ३५०० जणांचा मृत्यू झाला आहे. येथील मृत्यू दर सध्या तीन टक्क्यांवर आहे. सप्टेंबर महिन्यात पंजाबमध्ये दोन हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यावेळी रुग्णसंख्या ६० हजार इतकी होती. मृत्यू रोखण्यात केरळ, बिहार, आसाम, ओडिशा आणि आंध्र प्रदेश राज्यांनी चांगली कामगिरी केली आहे. येथील मृत्यूदर सर्वात कमी आहे.