नाशिक । प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवित कॉग्रेसच्या माजी प्रवक्त्या नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी महापालिकेत टक्केवारीने परिसिमा गाठली असल्याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे....
स्मार्ट सिटीच्या प्रत्येक टेंडरमध्ये अधिकार्यांकडुन केली जाणारी टक्केवारीची मागणी व मंत्रालयातून महापालिकेत होणार्या पोस्टींग आपण पुराव्यासह सादर करणार असल्याचे सांगत डॉ. पाटील यांच्या या पत्राने शहरात खळबळ उडवून दिली आहे.
नाशिक महापालिकेतील जेष्ठ नगरसेविका व कॉग्रेस पक्षांच्या माजी प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी आज मुख्यमंत्री ठाकरे यांना एक पत्र पाठवित महापालिकेतील कथित भ्रष्टाचार - गैरकारभारावर अंकुश लावण्याची मागणी केली आहे.
नाशिक महापालिकेत टक्केवारीने परिसिमा गाठली असल्याचे स्पष्ट करीत डॉ. पाटील यांनी महापालिकेत टक्केवारी व्यतिरीक्त इतर कोणत्याही गोष्टीवर चर्चा होत नसल्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. कोणीही मंत्रालयात जावे आणि कोणत्याही पोस्टींगचे पत्र घेऊन यावेत ही परिस्थीती आहे. सध्या महापालिकेत महत्वाच्या पदावर सगळे परसेवेतील अधिकारी आहे.
पदोन्नती कमेटीची बैठक होऊन स्थानिक अधिकार्यांना पदोन्नतीची संधी मिळावी. उलटपक्षी परसेवेतल अधिकारी महापालिकेकडे पैसे कमविण्याची संधी म्हणुन पाहत असल्याचा अनुभव आहे.
नाशिककरांनी आपल्या पक्षावर नेहमीच प्रेम केले असुन नगरविकास खाते आपल्याच पक्षाच्या ताब्यात आहे. अशावेळी महापालिकेत होणार्या चुकीच्या गोष्टीवर अंकुश ठेवला जावा अशी मागणी पाटील यांनी पत्रातून केली आहे.
महापालिकेतील या सर्व गैरव्यवहाराला चाप लावावा. यापुढे आपण आपणास स्मार्ट सिटीच्या कामापासुन प्रत्येक टेंडरमध्ये होणार्या गैरव्यवहार आणि टक्केवारीची अधिकार्यांकडुन होणारी मागणी व मंत्रालयातून होणारे पोस्टींग पुराव्यानिशी सादर करणार असल्याचेही डॉ. पाटील यांनी पत्रात म्हटले आहे.