दिल्ली | Delhi
भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार पाहायला मिळत होता. मात्र काही दिवसांपासून या लाटेचा वेग कमी होत आहे. मात्र देशातील एकूण मृतांची संख्या तीन लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत २ लाख ४० हजार ८४२ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ७४१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ६५ लाख ३० हजार १३२ इतकी झाली आहे.
तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ९९ हजार २६६ वर पोहोचली आहे. तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५५ हजार १०२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ३४ लाख २५ हजार ४६७ वर पोहचली आहे.
दरम्यान, करोनासोबतच आता म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह १४ राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
राज्यात दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त होत असलेल्यांची संख्या मागील काही दिवसांपासून सातत्याने अधिक आहे. ही बाब जरी दिलासा देणारी असली तरी, अद्यापही करोना रूग्णांच्या मृत्यू संख्या कमी झालेली नाही. गेल्या २४ तासांत राज्यात ४० हजार २९४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २६ हजार १३३ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ६८२ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.