दिल्ली | Delhi
करोनाची दुसरी लाट आणि नव्या स्ट्रेनने भारतात चांगलाच कहर केला आहे. एकीकडे केंद्र-राज्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात असून, करोनाच्या संसर्गाच्या प्रसाराला अद्यापही ब्रेक लागलेला नाही.
दरम्यान, गेल्या २४ तासात दैनंदिन रुग्ण संख्येत थोडीशी घट नोंदविली गेली आहे. मात्र देशात रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली, तरी मृत्यूचं प्रमाण वाढलं असून, ते कायम आहे. गेल्या आठवड्यात सलग चार ते पाच दिवस देशात दिवसाला चार हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद झाली होती. हा आकडा काही प्रमाणात कमी झाला असला, तरी सरासरी कायम आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख २९ हजार ९४२ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ८७६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी २९ लाख ९२ हजार ५१७ इतकी झाली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २ लाख ४९ हजार ९९२ वर पोहोचली आहे.
तसेच देशात गेल्या २४ तासात ३ लाख ५६ हजार ०८२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या १ कोटी ९० लाख २७ हजार ३०४ वर पोहचली आहे.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
राज्यातील करोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांत काहीसा कमी होताना दिसत आहे. राज्यात काल ३७ हजार ३२६ नवीन रुग्णांची नोंद झाली असून ६१ हजार ६०७ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले.