दिल्ली | Delhi
देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेना देशात हाहाकार माजवला होता. करोना रुग्णसंख्येने मोठा उच्चांक गाठला होता. दरम्यान, करोना महामारीची दुसरी लाट हळू-हळू ओसरत असल्याचं चित्रं आहे. मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्यानं घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच मृताची संख्याही घटत असल्याचेही समोर आलं आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या २४ तासांत १ लाख २० हजार ५२९ नवे करोना रुग्ण आढळले असून ३ हजार ३८० रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. देशातील एकूण करोना रुग्णसंख्या २ कोटी ८६ लाख ९४ हजार ८७९ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ३ लाख ४४ हजार ८२ वर पोहोचली आहे.
तसेच देशात गेल्या २४ तासात १ लाख ९७ हजार ८९४ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. या संख्येसह करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २ कोटी ६७ लाख ९५ हजार ५४९ वर पोहचली आहे. तसेच देशात सध्या उपचाराधीन रुग्णांची संख्या आता १५ लाख ५५ हजार २४८ वर पोहोचली आहे.
देशात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेदरम्यान आतापर्यंत एकूण २२ कोटी ७८ लाख ६० हजार ३१७ लसीचे डोस देण्यात आले आहेत. यातील ३६ लाख ५० हजार ०८० लसीचे डोस शुक्रवारी देण्यात आले.
महाराष्ट्रातील स्थिती काय?
राज्यातील करोना संसर्गाचे प्रमाण कमी होताना दिसत आहे. दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत आता घट होत असून, करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र अद्यापही राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये करोनाबाधित आढळून येत आहेत, शहरी भागांच्या तुलनेत आता ग्रामीण भागात संसर्ग काहीसा वाढल्याचे दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात २० हजार ८५२ रूग्ण करोनातून बरे झाले आहेत. तर, १४ हजार १५२ नवीन करोनाबाधितांची नोंद झाली आहे. याशिवाय राज्यात दिवसभरात २८९ रूग्णांचा मृत्यू देखील झाला आहे.