
नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात कालसुनावणी घेण्यात आली. आता आज पुन्हा नियमित सुनावणी होणार आहे. काल नबाम रेबिया प्रकरण, अपात्र आमदारांचा मुद्दा, अध्यक्षांचे अधिकार यावर वादाच्या फैरी झडल्या.
शिंदे गटाकडून हरीश साळवे , तर ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. सध्याच्या शिंदे-भाजप सरकारकडे असणारे बहुमत असंवैधानिक असल्याचा दावा यावेळी सिब्बल यांनी केला.
गेल्या 6 महिन्यापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित आहे. सध्या 5 न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणावर सुनावणी घेत आहे. काल झालेल्या सुनावणीत शिंदे-ठाकरे गटाच्या दोन्ही वकिलांनी युक्तिवाद केला. त्यानंतर आज पुन्हा यावर सुनावणी होणार आहे.
याबाबत ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई यांनी सांगितले की, अरुणाचलच्या नबाम रेबिया प्रकरणाचा दाखला शिंदे गटाकडून सातत्याने कोर्टात दिला जात आहे. त्या निकालात असलेल्या उणीवा, त्या आणि आजच्या केसमधील फरक याबाबत कोर्टात आमच्या बाजूने युक्तिवाद मांडला. रेबिया प्रकरण महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षासाठी लागू होत नाही हे कोर्टात आम्ही पटवून दिले. याचे विश्लेषण वकिलांनी व्यवस्थितपणे कोर्टात केले असे त्यांनी सांगितले.
तसेच आज अत्यंत महत्त्वाची सुनावणी झाली. जर 16 आमदारांना अपात्र ठरवलें तर त्याचा विधानसभेच्या संख्याबळावर किती परिणाम होईल. बैठकीला गैरहजर राहणे, स्वच्छेने पक्षाविरोधात वागणे म्हणजे स्वत:हून पक्ष सोडून देणे असे होते. कायद्याच्या दृष्टीने जे विश्लेषण करायचे होते ते आमच्या वकिलांनी मुद्देनिहाय केले.