नाशिक । प्रतिनिधी Nashik
शहर व जिल्ह्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर वार्याचा वेग वाढल्यामुळे जिल्हावासीय बोचर्या थंडीचा अनुभव घेत आहेत. मात्र, ही बोचरी थंडी शेतकर्यांच्या व पशुधनाच्या दृष्टीने त्रासदायक ठरत आहे.या थंडीमुळे मानवी आरोग्यावर कमालीचा परिणाम झालेला दिसून येत आहे. बदललेल्या वातावरणामुळे सर्दी, पडसे, खोकला या रुग्णांमध्ये कमालीची वाढ झाली आहे.
जिल्ह्यात दोन दिवसांपासून वाढलेल्या थंडीचा रब्बी पिकांना फायदा होणार असून गहू, हरभरा, कांद्याबरोबरच रब्बीच्या पिकांना हे वातावरण पोषक ठरणार आहे. मुंबईसह ठाणे, रायगड जिल्ह्यात किमान तापमान 14-15 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 26-29 अंश सेल्सिअस दरम्यान जाणवत असून ही दोन्ही तापमाने सरासरीपेक्षा 1 ते 2 अंश सेल्सिअसने खालावलेली आहेत. त्यामुळे नववर्षात महाराष्ट्रात थंडीची चाहूल लागत असतांनाच मुंबईसह कोकणातच थंडीचा प्रभाव अधिक जाणवत आहे. हा प्रभाव उत्तर भारतातील थंडी राजस्थान गुजराथ मार्गे कोकणात उतरत आहे. पुढील 5 दिवस थंडीचा हा प्रभाव कायम असेल असे दिसते.
कोकणाबरोबर महाराष्ट्रातील संपूर्ण खान्देश, नाशिक, नगर, पुणे,औरंगाबाद ,बुलढाणा, अकोला व अमरावती ह्या जिल्ह्यातही किमान तापमान सरासरीपेक्षा खालावले असून काहीशी थंडी जाणवत आहे. हळूहळू उत्तरेतील पश्चिमी प्रभावामुळे येत्या काही दिवसात थंडीत वाढ होण्याची शक्यता जाणवते, असा अंदाज निवृत्त हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे.