नाशिक । प्रतिनिधी
लाॅकडाऊन करुन करोना अटोक्यात येणार नाही हे माझे वैयक्तिक मत आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे येत्या दोन तीन दिवसात नाशिक दौर्यावर येत असून शहर व जिल्ह्यात लाॅकडाऊन लागू करायचा निर्णय ते घेतील असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. तसेच महाविकास आघाडी सरकार पाच वर्ष चालेल असे सांगत माजी मुख्यमंत्री फडणवीस व भाजप नेते अमीत शाह यांच्या भेटीवर त्यांनी खोचक टोला लगावला.
जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.१७) करोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे नाशिकचा दौरा करणार आहे. त्यांच्यासोबत तज्ञ अधिकार्यांची समिती देखील येणार आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एसएमबिटी व मविप्रच्या रुग्णालयात अतिरिक्त बेड बेडची व्यवस्था केली आहे.
शहरात सद्यस्थितीत 1200 बेडची व्यवस्था उपलब्ध आहे. शहरातील मृत्यू दर वाढत असला तरी आवाक्यात आहे.
लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्र्याशी बोललो आहे. मुख्यमंत्री आल्या नंतर लॉकडाऊन बाबत निर्णय घेतला जाईल. पोलीस आयुक्तांच्या बदलीची चर्चा मी ही ऐकतोय आणि शक्यता नाकारता येत नाही असे ते म्हणाले.
भाजप आमदारांना लाॅलीपाॅप
महाविकास आघाडी सरकार 5 वर्ष चालणार आहे. इकडे तिकडे बघू नये म्हणून भाजप आमदारांना वरिष्ठांकडून सत्ता परत येईल असं लॉलीपॉप दाखवत आहे.