कल्याण:
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray)यांनी पहिल्यांदाच मंदिरे (temple)उघडण्यावर भाष्य केलं आहे. राज्यातील मंदिरे टप्प्याटप्प्याने उघडण्यात येणार आहे, असं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केलं
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या विविध उपक्रमांचा लोकार्पण सोहळा आज झाला. यावेळी भाजपा आणि शिवसेनेचे नेते एका व्यासपीठावर आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी मंदिर उघडण्याबाबत भाष्य केलं. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील (kapil patil)यांनी आपल्या भाषणात भिवंडीतील बंद पडलेल्या आरोग्य केंद्र सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीचा संदर्भ पकडत त्यांनी भाजपा नेत्यांना कानपिचक्या दिल्या.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री म्हणाले, “आज मंदिरं जरी बंद असली तरी अत्यावश्यक आरोग्य मंदिरं मात्र सुरु आहेत. यासाठी जनता तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. धार्मिक स्थळं उघडली पाहिजे. हरकत नाही. कपिल पाटीलजी तुमच्याकडे आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे ना, की त्याच्या बाजूला मी मंदिरं उघडू. आरोग्य केंद्र बंद करून. आज आरोग्य केंद्र महत्त्वाचं आहे. आरोग्याची मंदिरे ही महत्त्वाची आहेत. मंदिरही उघडणार पण टप्पाटप्प्याने जाणार आहोत. आपण घोषणा देताना भारत माता की जय, वंदे मातरम देतो, द्यायला चांगल्या आहेत. आम्हीही त्या घोषणा दिलेल्या आहेत. घोषणेच्या पुढे जात आम्ही हिंदुत्वाचं रक्षण केलेलं आहे. हे ९२-९३ साली दाखवून दिलेलं आहे.”
तर जनता काय अपेक्षा ठेवेल?
कालच सर्वच राजकीय पक्षांना जबाबदारीने वागण्याची मी विनंती केली आहे. कारण कोरोनाचं संकट दाराशी आहे. त्यामुळे थोडं राजकीय पक्षाने संयमाने वागलं पाहिजे. राजकारण चालत राहील. पण आपण जबाबदारीने वागलं नाही तर कसं होईल? जनता कशी वागेल? जनता आपल्याकडून कशी अपेक्षा ठेवेल? ही जबाबदारी ओळखून सर्वांनी वागलं पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.