
मुंबई | Mumbai
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) त्र्यंबकेश्वरमध्ये (Trimbakeshwar) उरुस दरम्यान इतर धर्मियांकडून त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवार (दि.१३ मे) रोजी रात्री सव्वा नऊच्या सुमारास घडली होती...
त्यानंतर मंदिर प्रशासनाने वाद घालणाऱ्या जमावाला रोखले होते. तसेच पोलिस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला होता. मात्र जमावावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी विविध संघटनांकडून केली जात होती. यानंतर मंदिर प्रशासन आणि ब्राम्हण महासंघाने त्र्यंबकेश्वर पोलिसांना (Trimbakeshwar Police) पत्र लिहून याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती
तसेच कारवाई न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील ब्राह्मण महासंघाने दिला होता. त्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथित घटनेची गंभीर दखल घेत एसआयटीमार्फत (SIT) चौकशी केली जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर आता या प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे पण लोकांनीही सहकार्य केले पाहिजे. प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे. तसेच राज्यात सर्व जातीपातीची लोकं राहतात. कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाही. कुठलेही तणाव पूर्ण वातावरण राहणार नाही. कायदा व सुरक्षेची जबाबदारी सरकारची राहील असे त्यांनी सांगितले.
गुन्हा दाखल करणार - बी. जी. शेखर
दरम्यान त्र्यंबकेश्वर मंदिर कार्यालयात नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी चौकशी केली. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, १३ तारखेला त्र्यंबकेश्वर या ठिकाणी मंदिराजवळून एक मिरवणूक जात असताना काही जण मुख्य दरवाजातून धूप दाखवण्यासाठी आत प्रवेश करत होते.
सुरक्षा रक्षकांना त्यांनी धूप दाखवायचा आहे असे सांगितले. रात्री ९ वाजता मंदिर बंद होत असल्याने सुरक्षारक्षकांनी त्यांना अडवले. त्यामुळे ते तिथे थोडा वेळ थांबून तेथून परत गेले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात काही तक्रारी आल्या आहे. घटनेचा तपास करून गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती बी. जी. शेखर यांनी दिली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक शेवाळे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते.