मालेगाव | प्रतिनिधी | Malegaon
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी मुंबईतून गुजराथी आणि राजस्थानी लोकांना काढल्यास मुंबई ही आर्थिक राजधानी राहणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य केले. या विधानानंतर राज्यभरातून विविध संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत…
काही वेळापूर्वीच उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जहरी टीका केली आहे. आता मालेगाव दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीदेखील राज्यपालांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, 106 हुतात्म्यांचे बलिदान यामुळे आज मुंबई दिमाखात उभी आहे. मराठी माणसाचे मुंबईसाठी योगदान विसरता येणारे नाही. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे योगदानदेखील मुंबईसाठी अनन्य साधारण आहे.
मुंबईवर अनेक संकटे आली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे मुंबईच्या हितासाठी, रक्षणासाठी सह्याद्रीसारखे उभे राहिलेत. मराठी माणसाचा अवमान कुणीही करू नये.
राज्यपाल हे पद मोठे संवैधानिक आहे कुणाचा अपमान होणार नाही याची काळजी भगतसिंह कोश्यारी यांनी घेतली पाहिजे. राज्यपालांनी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक असून आम्ही त्याच्याशी सहमत नाही. राज्यपालांनी बोलतांना भान राखले पाहिजे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.