
नाशिक | Nashik
जालना जिल्ह्यातील (Jalna District) अंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची १०० एकरच्या मैदानावर आज जंगी सभा पार पडली. या सभेसाठी राज्यभरातील मराठा बांधव अंतरवाली सराटी गावात दाखल झाले होते. यावेळी सभेला संबोधित करतांना मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी अंतरवाली येथील सभेसाठी सात कोटी खर्च केल्याच्या आरोपांवर भाष्य करत भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. तसेच यावेळी त्यांनी सभेच्या खर्चाच्या पैशांचा हिशोब देखील उपस्थितांना सांगितला. त्यानंतर आता मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटलांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देत पलटवार केला आहे...
यावेळी बोलतांना भुजबळ म्हणाले की, राज्यात ओबीसी (OBC) ५४ टक्क्यांपेक्षा जास्त आहेत. मराठा समाजाला (Maratha Community) वेगळे आणि टिकणारे आरक्षण द्या. मनोज जरांगे पाटील यांचे मी काय खाल्ल आहे हे त्यांनी सांगावे. तसेच आता मनोज जरांगे पाटील कुणाचं खातं आहेत हे त्यांनी सांगावे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले. तसेच मी एका जातीचं प्रतिनिधित्व करत नाही. तर मी ओबीसी समाजाचे (OBC Community) प्रतिनिधित्व करतो. ओबीसी समाजासाठी काम करतो, सध्या तरी ओबीसी बचाव हे एकच आमचे काम आहे, असेही भुजबळ म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, शिवसेनेचा (Shivsena) जन्म झाला तेव्हापासून मी समाजकार्यात आहे. ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्द्यावर मी शिवसेना सोडली. मराठ्यांनी मला मोठे केले असे सांगून शिव्या दिल्या जात आहेत. मला मोठे हे शिवसेना पक्ष आणि बाळासाहेब ठाकरे यांनी केले. मराठा समाजाची मला मदत झाली. जयंत पाटील, अजित पवार या मराठा नेत्यांसोबत मी काम केले आहे. माझे देखील काहीतरी योगदान आहे, म्हणूनच मला संधी दिली गेली असेल. माझा माझ्या समाजासाठी जीव जाणार असेल तर आनंदच आहे, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
तसेच काल मंत्री भुजबळ यांना जीवे ठार मारण्याचा धमकी देणारा एक फोन आला होता. त्यावर देखील भुजबळांनी भाष्य केले. ते म्हणाले की, "मला धमकीचे फोन (Threatening Phone Calls) आणि मेसेज येत आहेत. एकदा नाही. तर अनेकवेळा धमकीचे फोन आणि मेसेज येत आहेत. तू जिवंत राहणार नाही. तुझी वाट लावू अशी धमकी देत आहेत. शिव्याही दिल्या जात आहेत. मी अशा धमक्यांना अजिबात घाबरत नाहीत. पोलिसांकडे (Police) यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलीस याचं काय ते पुढे बघतील," असे भुजबळ यांनी म्हटले.