
मुंबई | Mumbai
राज्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) प्रचंड नुकसान झाले असून एकीकडे होळी साजरी होत असतांना दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांची होळी झाली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत (Help) घोषित करण्याची गरज आहे. अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा आमदार छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज सभागृहात स्थगन प्रस्तावाद्वारे केली...
यावेळी भुजबळ म्हणाले की, अवकाळी पावसामुळे प्रचंड असे नुकसान (Damage) झाले असून काही ठिकाणी द्राक्षाच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने या बागा उभ्या करावे लागणार आहे. त्यामुळे हे द्राक्ष शेतकरी आता पाच वर्ष मागे गेले आहेत. कांदा, गहू, हरबरा, आंबा, भाजीपाला यासह अनेक शेती पिकाचे मोठ नुकसान झाले आहे. अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी अक्षरशा आपले तोंड बडवून घेत आहे. आज महिला दिन साजरा होत असताना माय माऊली देखील आपले तोंड बडवून घेत रडत असून ही अतिशय गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला असून अद्यापही शेतकऱ्यांना (Farmers) दिलासा मिळत नाही. तसेच नाफेड अद्यापही प्रत्यक्ष मार्केटमध्ये कांदा खरेदी न करता बाहेरच कांदा खरेदी करत आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने चक्क गाव विकायला काढले आहे. ही बाब अतिशय चिंताजनक असून परिस्थिती आता हाताबाहेर चालली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने कारवाई करत मदतीची घोषणा करून निर्णय घ्यावा अशी मागणीही छगन भुजबळ यांनी यावेळी केली.
दरम्यान, यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भुजबळांच्या या प्रश्नावर उत्तर देत शासनाकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असून तात्काळ मदत करण्यात येऊन सभागृहात सविस्तर निवेदन करण्यात येईल अशी माहिती दिली.