मुंबई :
आजपासून राज्य विधिमंडळाचे अधिवेशन (Maharashtra Assembly winter session) सुरू झाले आहे. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री सभागृहात उपस्थित नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अनुपस्थितीवरुन भाजपने जोरदार टोलेबाजी केली आहे. त्याला शिवसेनेकडूनही उत्तर देण्यात आले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी तब्येतीची काळजी घ्यावी, त्यांनी चार्ज कुणाला तरी द्यावा. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांच्याकडे थेट चार्ज देता येणार नाही. आधी त्यांना मुख्यमंत्री करावं लागेल. ज्याने शपथ घेतली आहे अशाच व्यक्तीकडे चार्ज द्यावा लागतो. रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री करायला काही हरकत नाही पण त्यासाठी त्यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागेल. उद्धव ठाकरेंच्या मनात आलं तर रश्मी ठाकरेंना मुख्यमंत्री करु शकतात असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंना टोला लागावला आहे.
अमृता फडणवीस लाईमलाईटमध्ये
चंद्रकांत पाटील यांच्या वक्यव्यावरुन आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला टोला लगावला आहे. "अमृता फडणवीस (amrita fadnavis)या अधिक लाईमलाईटमध्ये असतात, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेत्या करणार का हे पहिले विचारलं पाहिजे. रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray)या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात. चंद्रकांत पाटील हे मोठे नेते आहेत, पण कधीकधी त्यांची कीव करावीशी वाटते. आमच्यासारख्यांनी त्यांच्याबद्दल बोलणं चुकीचं आहे. रश्मी ठाकरे या कधीच लाईमलाईटमध्ये नसतात तरीही त्यांचं नाव घेतलं जातं. एकीकडे स्त्रियांचा आदर करतो असं सांगतात, पण दुसरीकडे हनन करायचं," असं म्हणत किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त केला.