
मुंबई | Mumbai
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या (Farmers) चिंतेत वाढ झाली आहे. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष, कांदा, गहू, या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचा मोहर देखील गळून पडला आहे...
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात ५ ते ८ मार्च दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची (Rain) शक्यता आहे. यामध्ये ५ मार्चला काही ठिकाणी ढगाळ हवामान (Cloudy weather) राहून पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर ८ मार्चला मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी गारपीट होईल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, दुसरीकडे पालघर, जळगाव, नाशिक धुळे, नंदुरबार, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, पूर्व विदर्भ व संलग्न मराठवाडा परिसरात ढगाळ वातावरण राहणार असून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविली आहे.
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा तडाखा
नाशिक जिल्ह्याला अवकाळी पावसाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून काल रात्रीपासून अनेक भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत. जिल्ह्यातील इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर निफाड तालुक्यासह अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस बरसला आहे. यामुळे गहू, कांदा, हरभरा द्राक्षांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत सापडला आहे.