नवी दिल्ली
वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने नवीन गाईडलाईन तयार केल्या आहेत. महाराष्ट्रात काही ठिकाणी कोरोनाचा उद्रेक दिसून येतो आहे. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती शहरांमध्ये कोरोनाची उच्चांकी संख्या नोंदली जात आहे. यामुळे केंद्र सरकारने १ एप्रिलपासून नवे निर्बंध लागू करण्याचे संकेत दिले आहेत. ३१ एप्रिलपर्यंत हे लागू असतील, असे या सूचनेमध्ये म्हटले आहे.
मध्य प्रदेश व कर्नाटकाने महाराष्ट्रातील बसेस व प्रवाश्यांना त्यांच्या राज्यात येण्यास बंदी घातली आहे. त्या पार्श्वभूमीचा उल्लेख करत गृहमंत्रालयाने नवीन गाईडलाईन तयार केल्या आहेत. कोरोनाव्हायरचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पुढचा प्रसार रोखण्यासाठी ठोस उपाय योजण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात यावेत, असे म्हटले आहे. स्थानिक, जिल्हा, तालुका पातळीवर लॉकडाउन करण्याचा निर्णय राज्य घेऊ शकते.
प्रवासबंदी असणार का?
गेल्या वर्षीच्या लॉकडाउनमध्ये आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतुकीवरही निर्बंध घालण्यात आले होते. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य वाहतूक बंद होती. आता मात्र कुठल्याही परिस्थितीत प्रवासाचे निर्बंध नसतील, असे केंद्राने जाहीर केले आहे. जिल्हाबंदी नसेल, राज्या राज्यांमधली प्रवासी वाहतूकही सुरू राहील, हे स्पष्ट करण्यात आले आहे. कोणत्याही व्यवहारांवर बंदी घालण्यात येणार नाही, पण निर्बंध असतील. दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी किंवा मालाची वाहतूक करण्यासाठी कोणते परमीट किंवा परवानगीची गरज नसणार आहे.