Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्यालोकसभेला भाजप चारशे जागा जिंकणार - प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

लोकसभेला भाजप चारशे जागा जिंकणार – प्रदेशाध्यक्ष बावनकुळे

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आगामी लोकसभा निवडणुकीत (upcoming Lok Sabha elections) देशभरात 400 हून जास्त तर महाराष्ट्रात 45 हून अधिक जागांवर विजय मिळवण्याचा निश्चय भाजपने केला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 200 पेक्षा अधिक जागा आम्ही जिंकू, असा विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP State President Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

भाजप प्रदेशाध्यक्ष झाल्यानंंतर बावनकुळे आज प्रथमच नाशिक दौर्‍यावर आले. पक्ष कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांचा माध्यमांच्या संपादकांशी संवाद कार्यक्रम झाला. यावेळी बावनकुळे यांनी पक्षाची वाटचाल, ध्येय-धोरणे याविषयी माहिती दिली. संपादकांच्या नजेरतून नाशिकच्या विकासाचे काही मुद्दे शासन दरबारी मांडून त्यातून विकासकामे साधण्यासाठी हा संवाद असल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार केंद्र सरकारच्या मार्गदर्शनात उत्तम काम करीत आहे. शेवटच्या माणसापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी हे सरकार सातत्याने काम करीत राहील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.

बारामती मतदारसंघावर भाजपाचे वर्चस्व स्थाापन करण्याच्या मुद्यावर वादळी सुरु असलेल्या चर्चेवर ते म्हणाले, देशात 144 लोकसभा मतदारसंघावर भाजपने लक्ष्य केंद्रित केले आहे. तेेथे येत्या सहा महिन्यात केंद्रीय मंत्री दौरे करणार आहेत. लोककल्याणाच्या योजनाचा आढावा घेणार आहे. अन्य मतदारसंघाप्रमाणे पक्षाने बारामती मतदारसंघावरही लक्ष केंद्रित केले आहे. तेथे केवळ भेट देणार म्हटल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी माझी ‘कुळे’ काढली. त्यामुळे आता मीदेखील दर तीन महिन्यांनी बारामती मतदारसंघाला भेट देणार आहे. 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत बारामतीत ‘घडी’ बंद पडल्याशिवाय शाांत बसणार नाही, याचा पुनरुच्चार त्यांनी केला.

बारामतीत शरद पवार यांनी विकास केला असेल तर उपकार केलेले नाहीत. सत्ताधार्‍यांचे ते कामच असते. 40 वर्षे त्यांना जनतेने निवडून दिले आहे. त्यामुळे मतदारसंघाचा विकास करणे हे त्यांचे कर्तव्यच आहे, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला. कांँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या टीकेचाही बावनकुळे यांनी समाचार घेतला. केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावे, हे त्यांचे विधान हास्यस्पद आहे. पटोले यांनी आधी स्वतःचे स्थान सांभाळावे, असे ते म्हणाले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण भाजप संपर्कात असल्याचा त्यांनी इन्कार केला. पृथ्वीराज चव्हाण यांना योग्य वागणूक दिली जात नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.

पक्षातील काही चुकीच्या गोष्टींवर बोलल्यामुळे त्यांना विधिमंडळातही चौथ्या-पाचव्या रांगेत बसवण्यात येते. मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या नेत्याला अशा तर्‍हेची सापत्न वागणूक देणे अयोग्य असते. भाजपत असे कधी होत नाही. ते भाजपचे गुणगाण गात असले तरी ते भाजपचे समर्थक झाले, असा होत नाही, असेही बावनकुळे म्हणाले. यावेळी आ. देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, माजी महापौर सतीश कुलकर्णी, रंजना भानसी, शहराध्यक्ष गिरीश पालवे, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, विजय साने, लक्ष्मण सावजी, रवी अनासपुरे, जगन पाटील, पवन भगूरकर आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

बावनकुळेंची फटकेबाजी

* नाना पटोले सध्या बावचळलेले नेते आहेत. त्यामुळे ते काहीही विधाने करतात.

* 2024 च्या निवडणुकीत बारामतीत राष्ट्रवादीचे घड्याळ बंद पाडणारच!

* बारामतीत केंंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तळ ठोकणार. मीही दरमहा एकदा जाणार.

* राज ठाकरे चांगले मित्र पण युतीची चर्चा नाही

* उद्धव ठाकरे समर्थकांनी आता शांत बसावे. रस्त्यावर संघर्ष टाळावा .

* आगामी काळ राष्ट्र बांंधणीचा, त्यामुळे मोदी-शहांच्या नेतृृत्वाची देशाला गरज.

* आगामी निवडणुका फडणवीस-शिंदे यांच्या नेतृत्वात.

- Advertisment -

ताज्या बातम्या