संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेताच चित्रा वाघ बरसल्या; म्हणाल्या...

संजय राठोडांनी मंत्रिपदाची शपथ घेताच चित्रा वाघ बरसल्या; म्हणाल्या...

मुंबई । Mumbai

यवतमाळमधील बंडखोर (Rebel) शिवसेना (Shivsena) आमदार आणि बंजारा समाजाचे नेते संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी शिंदे - फडणवीस सरकारमध्ये (Shinde Fadnavis Government) मंत्रिपदाची (Ministership) शपथ घेतली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राठोड यांना मंत्रीपद देणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे...

चित्रा वाघ यांनी ट्विट करत म्हटले की,पूजा चव्हाणच्या (Pooja Chavan) मृत्युला कारणीभूत असणाऱ्या माजी मंत्री संजय राठोडला पुन्हा मंत्रीपद दिले जाणे हे अत्यंत दुदैवी आहे.तसेच संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूच ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास आहे, असे चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यांनी या ट्विटमध्ये ‘लडेंगे… जितेंगे’ असे म्हणत मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलला टॅग केले आहे.

दरम्यान, अडीच वर्षापूर्वी विरोधी पक्षात असणाऱ्या भाजपने (BJP) संजय राठोड यांचे नाव या प्रकरणाशी जोडले होते. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या (Budget Session) आदल्या दिवशी राठोड यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. मात्र आता भाजपने ज्यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवले होते, ते संजय राठोड शिंदे फडणवीस सरकारमध्ये मंत्री झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

काय आहे पूजा चव्हाण प्रकरण?

मूळची बीड जिल्ह्यातील परळीच्या असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी २०२१ रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाने पुण्यातील मोहम्मदवाडी भागातील हेवन पार्क इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलेली. पूजासोबत राहणाऱ्या दोन जणांनी तिला रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचारादरम्यान तिला मृत्यू झाला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com