Thursday, April 25, 2024
Homeमुख्य बातम्याअतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

अतिवृष्टीमुळे ( Heavy Rain ) झालेल्या नुकसानीच्या सरकारी मदतीसाठी निकषांमध्ये बसत नसतानाही जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. बाधित शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून ७५५ कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील सहा लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे.

- Advertisement -

नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित आपद्ग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती नेमण्यात आली आहे. या बैठकीत बोलताना शिंदे म्हणाले, नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी आतापर्यंत अंदाजे ४ हजार ५०० कोटी रुपयांच्या निधीचे शासनाने वाटप केले आहे. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर मदतीचे वाटप केले असते तर ती अवघी १ हजार ५०० कोटी रुपये राहिली असती. त्यामुळे निकषापलिकडे जाऊन अधिक मदत करण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्याचा भरीव लाभ मिळणार आहे.

काही गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीसाठी विहित करण्यात आलेल्या निकषामध्ये बसत नसतानाही या झालेल्या नुकसानीपोटी मदतीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त औरंगाबाद, अमरावती आणि सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे सादर केले होते. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, उस्मानाबाद, या जिल्ह्यातील ४ लाख ३८ हजार ४८९ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील ३६ हजार ७११.३१ हेक्टर तर सोलापूर जिल्ह्यातील ७४ हजार ४४६ हेक्टर असे एकूण ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी रुपयांच्या निधीची मदत देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळ उपसमितीने मान्य केला आहे.

अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा

आतापर्यंत सुमारे ३ हजार ९०० कोटी रुपयांच्या मदतीचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले आहे. काही ठिकाणी हे मदतीचे वाटप सुरु असून सुमारे ३० लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. हे ३० लाख आणि आज मदतीचा निर्णय घेण्यात आलेल्या ६ लाख शेतकरी अशा अंदाजे ३६ लाख शेतकऱ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

आतापर्यंत सुमारे ३९५४ कोटी रुपये वितरित

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्याचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्तांकडून शासनास प्राप्त झाले होते. त्यानुसार ८ सप्टेंबर २०२२ रोजी सुमारे ३ हजार ४४५ कोटी २५ लाख आणि ५६.४५ कोटी इतका निधी नुकसानभरपाई पोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यास मान्यता दिली आहे. त्याशिवाय गोगलगायींमुळे झालेल्या नुकसानीपोटी औरंगाबाद विभागास ९८.५८ कोटी तर नाशिक, अमरावती, पुणे यांच्या सुधारित प्रस्तावानुसार ३५४.०७ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, मदत आणि पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले आदी उपस्थित होते.

मंत्रिमंडळ उपसमितीच्या निर्णयाचा ‘या’ जिल्ह्यांना होणार लाभ

औरंगाबाद – १२६७९ हेक्टर क्षेत्र, जालना- ६७८ हेक्टर क्षेत्र, परभणी – २५४५.२५ हेक्टर क्षेत्र, हिंगोली- ९६६७७ हेक्टर क्षेत्र, बीड- ४८.८० हेक्टर क्षेत्र, लातूर- २१३२५१ हेक्टर क्षेत्र, उस्मानाबाद- ११२६०९.९५ हेक्टर क्षेत्र, यवतमाळ- ३६७११.३१ हेक्टर क्षेत्र आणि सोलापूर- ७४४४६ हेक्टर क्षेत्र

एकूण क्षेत्र : ५ लाख ४९ हजार ६४६.३१ हेक्टर क

एकूण निधी : सुमारे ७५५ कोटी रुपये

- Advertisment -

ताज्या बातम्या