
मुंबई | Mumbai
बारसूतल्या रिफायनरीसाठी (Barsu Refinery Project) शेतक-यांवर जबरदस्ती करणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM eknath shinde) दिलीय. विरोध करणाऱ्यांशी चर्चा करून त्यांना विश्वासात घेऊ असं आश्वासन शिंदेंनी दिलं आहे.
बारसू रिफायनरी विरोधातलं आंदोलन तीव्र होताना दिसत असून प्रकल्पाचा पहिला टप्पा म्हणजे माती सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. यावेळी भू सर्वेक्षण केलं जात असताना आंदोलकांनी त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला असता यावेळी गोंधळाची स्थिती निर्माण झाली. सरकारच्या वेगवेगळ्या आश्वासनांनंतर देखील माती परिक्षण थांबवण्यावर आंदोलक ठाम आहेत.
दरम्यान, रिफायनरी विरोधी ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये झटापट झाली असता पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामध्ये काही ग्रामस्थ जखमी झाले आहेत. दरम्यान, आता, रिफायनरी विरोधी आंदोलकांनी तीन दिवस आंदोलन स्थगित (Protest Suspended For Three Days) करण्याची घोषणा केली आहे.
येथील माती परिक्षण तीन दिवस थांबवण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. रिफायनरीविरोधी स्थानिक आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, अटक करण्यात आलेल्यांची तात्काळ सुटका करा अशी मागणी रिफायनरीविरोधातील स्थानिक नेते काशीनाथ गोरिले यांनी केली आहे. तीन दिवसात माती परीक्षण न थांबवल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.
जिल्हाधिकारी बोलू लागताच आंदोलकांची चर्चेकडे पाठ
आंदोलकांशी चर्चा करण्यासाठी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी आंदोलकांनी मोर्चेस्थळी भेट दिली असता आंदोलनकर्त्या नागरिकांनी मात्र चर्चेवर बहिष्कार टाकल्याचं पाहायला मिळालं. जिल्हाधिकारी आणि वरिष्ट पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहचले असता नागरिक मात्र पाठ फिरवून निघून गेल्याचं दिसून आलं. घटनास्थळी ज्यांना प्रशासनासोबत संवाद साधायचा आहे ते कधीही संपर्क साधू शकतात असे सांगण्यात आलं. मात्र कोणीही चर्चेसाठी पुढे आले नाही. उलट जिल्हाधीकारी बोलत असताना आंदोलक नागरिक निघून गेल्याचे दिसून आले.
जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितले की, प्रशासनाकडून मागील महिनाभरापासून चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत. लोकांच्या प्रकल्पाबाबत असलेल्या शंका दूर करण्याचा प्रयत्न होत आहे. गुरुवारी, राजापूरमध्ये प्रशासन, रिफायनरी समर्थक, विरोधक संघटनांची बैठक झाली.
या बैठकीत तज्ज्ञदेखील सहभागी होते. जवळपास अडीच तास चर्चा झाली. प्रशासनाकडून स्थानिकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक गावकऱ्यांनी आपले प्रतिनिधींची नावे द्यावीत, आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू असे आवाहनही त्यांनी केले.