
नाशिक | Nashik
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून बाहेर पडत बहुसंख्य आमदार आणि खासदारांसह पक्षाचे अधिकृत चिन्ह आणि नावही स्वतः कडे मिळवले आहे. मात्र खरी शिवसेना ही ठाकरे गटाचीच या मतावर ठाकरे गट अजूनही ठाम आहे. एवढेच नव्हे तर, शिंदे गटाकडे गेलेले सर्व नेते ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे परत येतील असा विश्वासही ठाकरे गटाला आहे...
आम्हीच खरी शिवसेना (Shivsena) असून सध्याच्या सरकारचे काही खरं नाही. कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहे. आज एकीकडे आंदोलने होत असताना दुसरीकडे मात्र सरकार व्यस्त आहे. लवकरच भाजपाला (BJP) जोडून गेलेले शिवसेनेत येणार आहेत. मात्र एकनाथ शिंदे येणार नाही, त्यांना आम्ही घेणारही नाहीत, असा सणसणीत टोला खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी लगावला आहे ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.
येत्या 26 मार्चला मालेगाव (Malegaon) शहरात उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांची सभा होणार आहे. या सभेच्या पाहणीसाठी संजय राऊत (Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आहेत. आज सकाळी नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची कोकणातील खेडमध्ये सभा झाली. त्यानंतर राज्यात इतर ठिकाणी देखील सभा घेण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे मालेगावमध्ये 26 तारखेला उत्तर महाराष्ट्राची ही सभा होणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.
मालेगावमधून माजी मंत्री प्रशांत हिरे यांचे पुत्र अद्वय हिरे यांनी नुकताच ठाकरे गटामध्ये प्रवेश केला त्यांचा उल्लेख करताना संजय राऊत म्हणाले की, हिरे कुटुंब हे राजकारणातील एक महत्वाचे कुटुंब आहे. लवकरच अद्वय हिरे यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल. त्याचबरोबर मालेगाव हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, गद्दारांचा नाही, असा टोलाही मंत्री दादा भुसे यांचे नाव न घेता लगावला आहे.