नवी दिल्ली
बाबरी मशीद विध्वंस (babari masjid) प्रकरणाचा निकाल आज (बुधवारी) लखनऊ येथील विशेष सीबीआय न्यायालयने दिला.
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व ३२ आरोपी आहेत. त्यातील २६ आरोपी न्यायालयात हजर होते. ६ आरोपी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर झाले. या प्रकरणात सर्व ३२ आरोपींना निर्दोष सोडण्यात आले. ही घटना पुर्वनियोजित नव्हती, असे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान निकाल देणारे न्यायाधीश एस.के. यादव आज निवृत्त होणार आहे. तब्बल २८ वर्षांनी या खटलाच निकाल आला. दोन हजार पानांचे हे निकालपत्र आहे.
लालकृष्ण आडवाणी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हजर झाले. मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान, महंत नृत्य गोपाल दास, माजी मुख्यमंत्री कल्याण सिंगही न्यायालयात नव्हते.
कारसेवकांनी ६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडली होती. लालकृष्ण अडवाणी, कल्याण सिंग, उमा भारती यांच्यासह ३२ आरोपींवर बाबरी मशिदी पाडल्याचा कट केल्याचा आरोप होता.
४९ जणांवर एफआयआर, १७ जणांचे निधन
अयोध्याच्या बाबरी विध्वंस प्रकरणात एकूण ४९ जणांविरूद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता. त्यातील १७ जणांचे निधन झाले आहे. पहिली एफआयआर फैजाबाद पोलिस ठाण्यात रामजन्मभूमीच्या एसओ प्रियंवदा नाथ शुक्ला यांनी आणि दुसरी एफआयआर एसआय गंगा प्रसाद तिवारी यांनी दाखल केली होती. उर्वरित ४७ एफआयआर वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या पत्रकार आणि फोटोग्राफरने दाखल केली होती. यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयला सोपवली गेली होती. सीबीआयने बाबरी विध्वंस प्रकरणाचा तपास करून एका वर्षापेक्षाही कमी कालावधीत ५ ऑक्टोबर १९९३ रोजी ४९ आरोपींविरूद्ध आरोपपत्र दाखल केले. पण १३ आरोपींना विशेष न्यायालयाने आरोपांच्या स्तरावरच डिस्चार्ज केले. याला प्रथम उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.