
मुंबई | Mumbai
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Elections) काँग्रेसने (Congress) मोठा विजय मिळवल्यानंतर राज्यात महाविकास आघाडीतील उत्साह वाढल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पुढील वर्षी महाराष्ट्रात (Maharashtra) होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकांसाठी विरोधकांची एकजूट झाली असून त्यादृष्टीने निवडणुका एकत्र लढविण्यावर एकमत करण्यात आले आहे...
काल (रविवार) संध्याकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत मविआची बैठक पार पडली. या बैठकीत काय चर्चा झाली याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सयुंक्त पत्रकार परिषद घेत माहिती दिली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी विविध विषयावर भाष्य करत जागावाटप कसे होईल, यासंदर्भात भूमिका मांडली आहे.
यावेळी अजित पवार म्हणाले की, २०१४ पासून नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वात केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आले. कर्नाटकमध्येही कार्यकर्त्यांमध्ये मोठा जोश होता, मात्र कर्नाटकमध्ये पराभव स्विकारावा लागल्याने भाजपमध्ये (BJP) निराशा पसरली असून या विजयामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह संचारल्याचे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, कालच्या बैठकीत मविआची (MVA) पुढची वाटचाल काय असायला हवी, वज्रमूठच्या राहिलेल्या सभाही व्हायला हव्यात यावर चर्चा झाली. महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिघांनी ४८ जागांबाबतचे वाटप करावं. कोणत्या जागा कुणी लढायच्या ते ठरवावे. २८८ जागांची चर्चा करता आली तर तीही करावी, असे ठरलं. कारण काहींना असे वाटतंय की कदाचित लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होतील. त्यामुळे एकदम ऐनवेळी निवडणुका लागल्यानंतर धावपळ व्हायला नको म्हणून त्याबद्दलचीही चर्चा झाली, असे पवारांनी म्हटले. तसेच जागा वाटप करताना प्रत्येक पक्षातील दोन नेत्यांमध्ये बसून चर्चा होईल असेही अजित पवारांनी यावेळी सांगितले.