
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी महाराष्ट्र विधिमंडळाला (Maharashtra Legislative) चोरमंडळ म्हटल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर राऊतांच्या विधानावर आक्षेप घेत भाजप आणि शिवसेनेच्या (BJP and Shiv Sena) आमदारांनी (MLA)त्यांच्यावर हक्कभंग आणण्याची मागणी केली. यानंतर विधानसभेत त्यांच्यावर हक्कभंग (Infringement of Rights) आणण्यात आला असून ८ मार्चला हक्कभंग प्रस्तावावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) निर्णय देणार आहेत.
संजय राऊतांच्या या विधानाचा राज्यातील सत्ताधाऱ्यांनी तीव्र निषेध केला असून ठाकरे गटाच्या (Thackeray Group) आमदारांसह (MLA) कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांनी राऊतांच्या विधानाचे समर्थन करत नसल्याचे म्हटले आहे. तर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) देखील राऊतांच्या विधानाचा समाचार घेत त्यांना खडेबोल सुनावले आहेत.
विधानसभेत बोलतांना अजित पवार म्हणाले की, "आपण सर्वजण आपापल्या मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करत आहोत. कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला, नागरिकाला अशाप्रकारे चोरमंडळ म्हणण्याचा अधिकार नाही. तसेच पक्षीय गोष्टीला बाजूला ठेवून याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. प्रत्येकाने आपले मत मांडले पाहिजे, पण काहीही बोलू नये. तसेच संजय राऊत खरंच बोलले आहेत का? याची देखील शहानिशा झाली पाहिजे. बोलले असतील तर योग्य ती कारवाई केली पाहिजे. त्यांना योग्य संदेश दिला पाहिजे,"असं स्पष्ट मत त्यांनी माडले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?
"विधिमंडळमध्ये बनावट शिवसेना आहे. हे बनावट चोरांचं मंडळ आहे. त्यांनी आम्हाला पदावरून काढले तरी आम्ही पक्ष सोडणार नाही. कारण अशी अनेक पदं आम्हाला पक्षाने, बाळासाहेब ठाकरे यांनी दिली. ती पदे आम्ही अशी ओवाळून टाकतो. पदं गेली तर परत येतील, पण आम्हाला आमचा पक्ष महत्त्वाचा आहे," असं संजय राऊतांनी म्हटले होते.