
नाशिक | Nashik
आज नाशकात (Nashik) 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम पार पडत असून या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळीच 'वंदे भारत एक्सप्रेस'ने नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अजित पवारांचे नाशिकरोड रेल्वे स्थानकावर (Nashik Road Railway Station) आगमन होताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
यानंतर नाशिकरोड रेल्वेस्थानक ते शासकीय विश्रामगृहापर्यंत बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी असंख्य कार्यकर्ते रेल्वेस्थानकावर उपस्थित होते. त्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) माध्यमांशी संवाद साधत विविध विषयांवर भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले की, येत्या १७ जुलैपासून राज्याचे पावसाळी अधिवेशन सुरु होत असून अधिवेशनात राज्यातील प्रश्न मांडले जातील. तसेच राज्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. याशिवाय धरणातील पाणीसाठा देखील कमी झाला असून नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे अजित पवारांनी म्हटले.
पुढे अजित पवार म्हणाले की, लवकरच सर्व मंत्र्यांची बैठक घेऊन महायुतीमधील सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करेल. तर मी जाहिरातबाजी करणारा नेता नाही असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला. तसेच देशात मोदींच्या नेतृत्वाला दुसरा पर्याय नसून पंतप्रधानांची भेट घेऊन केंद्राकडून अधिक निधी मिळविण्याचा प्रयत्न करेल असेही अजित पवार म्हणाले.
तर पावसाळी अधिवेशनात सामान्य शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले. तसेच अद्यापही काही नेते आरोप-प्रत्यारोप करण्यात व्यस्त असून अधिवेशनाच्या चहापानादरम्यान विरोधक चर्चेला तयार असतील तर चर्चा करणार. कारण चर्चा करुन सर्व प्रश्न सुटू शकतात, यावर विश्वास असल्याचे अजित पवार म्हणाले.
तसेच लवकरच रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन पुणे - नाशिक रेल्वे मार्गावर देखील तोडगा काढणार असल्याचे प्रतिपादन अजित पवारांनी केले. याशिवाय नाशिकच्या विमानतळाचा प्रश्न देखील लवकरच मार्गी लावणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.