
मुंबई | Mumbai
काल छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा पार पडली. यावेळी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेससह ठाकरेंच्या शिवसेनेने भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली. या टीकेनंतर भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांनी देखील मविआला प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे...
यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारची जनतेच्या पैशातून जाहीरताबाजी सुरु असून त्यांच्याकडे सध्या दुसरे कोणतेही मुद्दे राहिले नाहीत. एखाद्या योजनेची जाहीरात देऊन लोकांना माहिती दिली असेल तर ते ठिक असल्याचे अजित पवारांनी (Ajit Pawar) म्हटले.
तसेच काल माविआच्या सभेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे गैरहजर होते. त्याबाबत अजित पवारांना विचारले असता ते म्हणाले की, प्रत्येक सभेला प्रत्येकजण उपस्थित असेल असे नाही. एक धोरण स्वीकारले आहे. प्रत्येक पक्षाचे दोन नेते बोलतील. त्यामुळे कालच्या सभेत कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे दोन नेते बोलले. तर भाषण झाल्यानंतर बाळासाहेब थोरातांना पुढे सुरतला जायचे असल्याने ते लगेच निघून गेल्याचे पवारांनी सांगितले. याबाबत त्यांनी आम्हाला कल्पना दिली होती असेही त्यांनी स्पष्ट केले.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) डिग्रीवरुन सुरु असलेल्या वादावर अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यावर उत्तर देताना ते म्हणाले की, "आहो, २०१४ ला त्यांची डिग्री पाहून त्यांना निवडून दिले आहे का? त्यांनी (मोदींनी) देशात २०१४ ला स्वत:चा करिश्मा निर्माण केला. यापूर्वी भाजपाचा हा असा करिश्मा जम्मू-काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत नव्हता. त्याचे सर्व श्रेय मोदींनाच दिले पाहिजे . डिग्रीचे काय? आधीच्या काळापासून आतापर्यंत जे देशाचे पंतप्रधान किंवा वेगवेगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री झाले त्यांना आपल्या लोकशाहीमध्ये बहुमताचा आदर करुन निवडण्यात आले आहे. इथे ५४३ ची संख्या आहे. त्यात ज्याचे बहुत असेल तो तिथं प्रमुख होतो. आपल्या राज्यात १४६ चे ज्याचे बहुमत असेल तो त्या ठिकाणी मुख्यमंत्री होतो," असे अजित पवारांनी म्हटले.
तसेच कालच्या वज्रमूठ सभेत अजित पवार आणि उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले. अमित शाहांचे नाव घेतले. मात्र, देवेंद्र फडणवीस यांचे नाव कुठेही घेतले गेले नाही. त्यावर अजित पवारांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, "तुमची सूचना लक्षात घेतली. पुढच्या सभेत मला बोलायची संधी मिळाली तर मी देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन भाषण करणार " असे त्यांनी म्हटले असता पत्रकार परिषदेत एकच हशा पिकला.