
मुंबई | Mumbai
अजित पवारांनी (Ajit Pawar) केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीत (NCP) मोठी फुट पडली असून राज्याच्या राजकरणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. या फुटीनंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले असून आज शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांच्या मुंबईत बैठका पार पडत आहेत. या बैठकीत दोन्ही गटाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले...
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांच्या गटातील कार्यकर्त्यांना मुंबईतील एमईटी कॉलेज येथे संबोधित करतांना शरद पवारांवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी ते म्हणाले की, जर शरद पवार यांनी दौरे घेऊन सभा घेतल्या तर मला पण तिकडे सभा घेऊन उत्तर द्यावे लागेल. ही वेळ येऊ देऊ नये आता आराम करावा, घरातच दुरावा नको यायला असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना घरातच आव्हान दिले.
पुढे ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे श्रद्धास्थान आहे. माझ्यावर लहानपणापासूनच साहेबांचे संस्कार झाले. मी सत्तेसाठी नाही तर लोकांच्या हितासाठी असा निर्णय घेतला. मी पवार साहेबांच्या छत्रछायेखाली घडलो आहे. १९७७ ला देशपातळीवर निवडून आलेला जनसंघ पक्ष आता कुठे आहे? आता शोधावा लागत आहे. देशाला सक्षम नेतृत्वाची गरज असते ती आज मोदींच्या नेतृत्वात पूर्ण होत आहे. पंचविशीपासून ते पंच्याहत्तरीपर्यत आपण योग्य काम करु शकतो, अंगात बळ असते, जिद्द असते. नंतर मात्र क्षमता कमी होतात, असेही अजित पवार यांनी म्हटले.
तसेच २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवर पहिल्यांदाच अजित पवारांनी उघडपणे भूमिका मांडली. यावेळी ते म्हणाले की, २०१९ ला भाजपसोबत जायचा निर्णय पवार साहेबांनीच घेतला होता. सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीकडून मला ही जबाबदारी दिली गेली होती. सर्व चर्चा झाल्या, पाच बैठका झाल्या. मला सांगितले कुठे बोलायचे नाही. त्यानंतर जे घडले तुम्हाला सगळे माहिती आहे. पण मला उगाच बदनाम केले जात आहे. त्यानंतर अचानक बदल झाला आणि सांगितले की आपल्याला शिवसेनेसोबत जायचे आहे. आधी शिवसेना (Shivsena) जातीवादी मग मित्र कसा झाला, असा सवालही अजित पवार यांनी उपस्थित केला.