
मुंबई | Mumbai
मुलाच्या गाडीचा अपघात झाल्यावर स्थानिकांशी झालेल्या वादानंतर ठाण्याचा माजी नगरसेवक मदन कदम यांनी सातारा जिल्ह्यातल्या मोरणा (ता. पाटण) येथे गोळीबार केला. या घटनेत दोन स्थानिकांचा मृत्यू झाला तर एकजण अत्यवस्थ आहे. किरकोळ कारणावरुन गोळीबार करुन दोघांचा जीव घ्यायला ही काय मोगलाई आहे का? असा संतप्त सवाल करत राज्यातल्या कायदा-सुवव्यस्थेच्या प्रश्नी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक झाले.
या गोळीबाराच्या घटनेमुळे मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात स्थानिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे. नातेवाईकांकडून कडक कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात मदन कदम आणि त्यांच्या दोन मुलांना अटक केली असली तरी जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी अजित पवार यांनी केली.
नेमकं प्रकरण काय?
१५ मार्च रोजी ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम यांच्या मुलाच्या वाहनाचा मोरणा परिसरात अपघात झाला होता. अपघातावेळी त्यांची स्थानिकांशी बाचाबाची झाली होती. त्यानंतरही दोन-तीन दिवसांनी स्थानिक ग्रामस्थ आणि कदम यांच्यात वादावादी झाली होती.
याचा राग मनात धरून रविवारी रात्री ठाण्याचे माजी नगरसेवक मदन कदम याने मोरणा भागात बेछुट गोळीबार केला. गोळीबारावेळी आरोपी मदन कदम याच्यासोबत त्याची दोन मुलेसुद्धा होती. ही घटना मदन कदम यांच्या गुरेघर येथील फार्महाऊसवर घडल्यानं ते अडचणीत सापडले आहेत. मृत व्यक्ती या गुरेघरपासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या कोरडेवाडी गावातील आहेत.