अहमदनगर (प्रतिनिधी)
नगर (ahmednagar) शहरातील वाहतूक कोंडी (Traffic jam) आणि बेशिस्तीचा फटका आजवर अनेकांना बसला आहे. यामुळे निर्माण होणारा संताप संबंधीत यंत्रणा कधीही गंभीरपणे घेत नसल्याने स्थिती अधिकच बिघडत आहे. याच संतापाला ग्राहक संघाचे माजी अध्यक्ष शिरीष बापट (shirish bapat) यांनी पुन्हा एकदा वाट मोकळी करून दिली आहे.
यावेळी त्यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांनी (District Superintendent of Police) वर्षभरापूर्वी केलेल्या घोषणेची आठवण करून देत नगर शहरात राजकारणी आणि बेशिस्त नागरिकांनी अनेक वाघांची शेळी केली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. त्यासोबतच शिस्त लावल्याची टिमकी वाजवणे बंद करावे, असा अप्रत्यक्ष सल्लाही शहर वाहतूक शाखेला दिला आहे.
अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी 21 ऑक्टोंबर 2020 रोजी पत्रकार परिषद घेऊन शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून उपाययोजना करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यास आता एक वर्षाचा कालावधी झाला आहे.आता तरी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी शहराच्या वाहतुक समस्येकडे लक्ष द्यावे, असे बापट यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करुन त्या तडीस नेण्याचा मानस असल्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. पण अहमदनगर शहरात आलेल्या अनेक वाघांची राजकीय पक्षातील नेत्यांनी व नगरकरांनीही शेळी केली आहे, हे त्यांना माहिती नाही असा टोला लगावला आहे.
आपण शहराच्या वाहतूक परिस्थितीची माहिती करुन घेण्यासाठी फिरत असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र ते शहरात फिरताना अस्पष्टसेही कोणाला दिसल्याचे आठवत नाही. तत्कालीन शहर वाहतूक शाखेच्या अधिकार्याने आपण शहरातील वाहतुकीला शिस्त लावली आहे याची टिमकीच वाजवली होती, असे बापट पत्रकात म्हणतात.
अपयशी ठरल्याचे जाहीर करा
नगर शहर वाहतूक शाखा जीवंत असेल तर शहराला शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा. त्याच बरोबर एकेरी वाहतूक, सम-विषम तारखांची अंमलबजावणी, नो पार्किंग झोन, अरुंद रस्त्यांवर चारचाकी वाहने उभी करण्यास बंदी यासारखी उपाययोजना करणे आवश्यक आहे. हे जमत नसेल तर पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आम्ही शहराला शिस्त लावण्यात अपयशी आहोत हे जाहीर करावे, अशी मागणीही या पत्रकात बापट यांनी केली आहे.