Monday, April 29, 2024
Homeनगरया व्यक्तींना मंदिर प्रवेश असेल बंद

या व्यक्तींना मंदिर प्रवेश असेल बंद

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्य शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे, मंदिरे 16 नोव्हेंबरपासून उघडली आहेत.

- Advertisement -

मात्र, या मंदिरांमध्ये 65 वर्षांवरील व्यक्ती, गर्भवती महिला तसेच 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. दोन भक्तांमध्ये सहा फुटाचे अंतर राहील, असे दर्शन रांगेत नियोजन करण्याचा आदेशही जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. मंदिरांबाबत जिल्हाधिकार्‍यांनी नियमावली जाहीर केली असून त्याचे पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

राज्य सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दिवाळी पाडव्यापासून जिल्ह्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे उघडण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबतचे आदेश मंगळवारी काढले आहेत. यात धार्मिक व्यवस्थापनाांसाठी नियमावलीच तयार करून दिली आहे. मास्क वापरणे, शारीरिक अंतर राखणे, सॉनिटायझर वापरणे भाविकांना अनिवार्य करण्यात आले आहे.

मंदिरांमध्ये कोणत्याही प्रकारे प्रसादाचे वाटप केले जाणार नसून भाविकांनाही फुल, हार, नारळ अशा वस्तू अर्पण करता येणार नाहीत. या आदेशामध्ये जाहीर करण्यात आलेली नियमावलीमध्ये तब्बल 28 नियमांचे पालन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.

असे आहे नियमावली

कमीत कमी सहा फुटाचे अंतर राखणे, मास्क, सॉनिटायझरने वारंवार हात धुणे, प्रवेशद्वारावर सॉनिटायझर, थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था, आजाराची लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश, मास्क असेल तरच मंदिरात प्रवेश, प्रतिबंधात्मक उपायांवरील फलक लावणे, जनजागृतीसाठी ऑडिओ, व्हीडिओ क्लीप लावणे, पादत्राणे गाडीतच ठेवावीत, रांगांमध्ये शारीरिक अंतराच्या खुना आवश्यक, हात-पाय साबणाने स्वच्छ धुणे बंधनकारक, पुतळे, मूर्ती, ग्रंथांना स्पर्श करण्यास मनाई, गायन-भजन गटांना परवानगी नाही, अन्नदान करताना नियमांचे पालन आवश्यक, मंदिरातील कर्मचार्‍यांची कोविड चाचणी आवश्यक, अंतरानुसार दर्शनासाठी दिवसाला संख्या निश्‍चत करणे यांचा समावेश आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या