
मुंबई | Mumbai
भाजपला सोडचिठ्ठी देऊन दादा भुसे यांना आव्हान देण्यासाठी अद्वय हिरे यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना भवन या ठिकाणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या उपस्थितीत अद्वय हिरे यांनी शिवबंधन हातावर बांधले आहे...
यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, आतापर्यंत ज्यांना आम्ही हिरे समजत होतो ते सगळे गद्दार निघाले. बरे झाले गद्दार निघून गेले आणि हिरे आपल्याकडे आले. असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांनी म्हटले आहे की, अद्वय हिरे यांचा शिवसेनेतील प्रवेश जेवढा महत्त्वाचा आहे तेवढाच तो हिरे कुटुंबासाठी महत्त्वाचा आहे. आत्तापर्यंत अद्वय हिरे शिवसेनेमुळे विधानसभेत पोहचू शकले नाहीत, आता शिवसेनेमुळेच ते विधानसभेत पोहचणार आहेत
शिवसेनेतून कितीही बाजारबुणगे निघून गेले तरीही काहीही फरक पडत नाही असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना टोला लगावला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, भाऊसाहेब हिरे यांची संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका होती. मुंबई महाराष्ट्रासोबत असावी ही जी कठोर भूमिका ज्या प्रमुख नेत्यांनी मांडली त्यातील एक भाऊसाहेब होते. त्यांच्याच कुटुंबातील अद्वय हिरे आज शिवसेनेच्या कुटुंबात आले आहेत.
शिवसेना एकसंध आहे आणि आपले नेतृत्त्व उद्धव ठाकरे करत आहेत. तुमच्यामुळे शिवसेनेला तरूण नेतृत्व मिळाले आहे. शिवसेना तुम्ही पुढे न्याल, असा विश्वास आम्हाला वाटतो, असे राऊतांनी म्हटले आहे.