
मुंबई | Mumbai
ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदेंना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ मविआने (MVA Morcha) आज ठाणे पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला. या मोर्चावेळी जाहीर सभा घेण्यात आली. त्यावेळी माजी मंत्री व आमदार आदित्य ठाकरे (MLA Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला...
यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केल्याचे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असे जाहीर आव्हानही आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) दिले.
पुढे ते म्हणाले की, हे सरकार काही महिन्यांचं किंवा काही दिवसाचं नाही तर अवघ्या काही तासांचं आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर प्रहार करत असताना त्यांची मिमिक्री देखील केली. तसेच पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळं आणलेलं आहे. कारण काल जेव्हा मिंधेंच्या गद्दार गँगच्या लोकांनी, टोळींनी जेव्हा शिंदे ताईंवर हल्ला केला, तेव्हा तक्रार घ्यायला तयार नव्हते. त्यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर पोलीस आयुक्त पळून गेले होते, असा दावाही आदित्य ठाकरेंनी केला.
दरम्यान, यावेळी माजी मंत्री व आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) अनिल परब, खासदार राजन विचारे, विनायक राऊत, ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांच्यासह मविआचे आदी नेते उपस्थित होते.