
नाशिक | Nashik
राज्यातील काही भागांत कमी प्रमाणात तर काही ठिकाणी पाऊस (Rain) न झाल्यामुळे त्या भागांत दुष्काळ पडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. तशीच काहीशी परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांतील गावांमध्ये पाहायला मिळत आहे. याच दुष्काळाच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी राज्याचे माजी मंत्री तथा आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी निफाड आणि सिन्नर तालुक्यांमधील (Niphad and Sinnar Taluka) गावांत जाऊन दुष्काळाचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी आज सिन्नर तालुक्यातील ओझर शिर्डी महामार्गावरील हिवरगाव कोमलवाडी आणि निफाड तालुक्यातील भेंडाळी गावात जाऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात शेतकरी कुटुंबाशी संवाद साधला. यावेळी शेतकरी बांधवांना स्वतःची दुष्काळाची व्यथा मांडताना रडू कोसळल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, 'आपण पाहत आहोत की पाऊस नसल्याने शेती पिकांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री बोलून मोकळं व्हायचं अशी भूमिका घेत आहेत, पण जनतेचे कान उघडे आहेत, मग शेजारच्या लोकांनी माईक चालु असल्याचे सांगत, जास्त बोलू नका' असा सल्ला दिला. ही जी वृत्ती आहे ना, की आपल्याला जो मोठे करतो, आपल्यासोबत राहून सगळे काही देतो, त्याच्याच पाठीत खंजीर खुपसून निघून जायचे, ही वृत्ती जनतेने ठेचून काढली पाहिजे, पण घाबरू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत असे ठाकरे यांनी म्हटले.
ते पुढे म्हणाले की, नाशिक जिल्ह्यात अद्यापही चांगल्या पावसाची (Nashik Rain) प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणची पिके पावसाअभावी जळून गेली आहेत, उरले सुरले पिके जगविण्यासाठी शेतकरी धडपड करत आहेत. पाऊस नसल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अशा संकटकाळात बळीराजाला मजबूत पाठबळ हवे असून आम्ही ते देणार, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना दिला.
तर सिन्नर तालुक्यातील हिवरगाव कोमलवाडी येथील शेतकऱ्यांना आदित्य ठाकरे यांनी पिक कोणते आहे आणि त्याला येणारा खर्च किती? याबाबतची माहिती विचारत शेतात बसून शेतकऱ्यांच्या व्यथा जाऊन घेतल्या. यावेळी येथील शेतकऱ्यांनी आदित्य ठाकरे यांना शेतात जळालेले सोयाबीन पिकांच्या काड्या दाखवत, बघा साहेब, हा आहे सिन्नरचा दुष्काळ सांगा तुम्ही हेक्टरी किती अनुदान पाहिजे? एकरी साडे बावीस हजार सोयाबीन पिक उभारणीचा खर्च आहे, असे म्हटले.
दरम्यान, यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत माजी आमदार राजाभाऊ वाजे, अनिल कदम, ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख दीपक खुळे, सुधाकर बडगुजर, भारत कोकाटे, यांच्यासह ठाकरे गटाचे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.