नवी दिल्ली । वृत्तसंस्था New Delhi
स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचे ( Swatantryacha Amrut Mahotsav ) औचित्य साधत घरोघरी तिरंगा मोहिमेला कालपासून देशभरात हर्षोल्हासात प्रारंभ झाला. मोहिमेंतर्गत देशातील कोट्यवधी नागरिकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवत देशभक्तीचा जागर केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासह बॉलिवूड, क्रीडासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आपल्या निवासस्थानावर तिरंगा फडकवून मानवंदना दिली.लडाखमध्ये 18हजार 400 फूट उंचीवर इंडो तिबेटीयन पोलीस दलाकडून तिरंगा लावण्यात आला.
कोल्हापूर पोलीस उद्यानातील देशातील दुसर्या क्रमांकाचा आणि महाराष्ट्रातील सर्वाधिक 303 फूट उंचीचा राष्ट्रध्वज मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आसमंतात फडकला. जिल्ह्याच्या विकासासाठी हातात हात घालून काम करू या, असे आवाहन यावेळी मंत्री पाटील यांनी केले. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी मीनाताई गुरव, स्वातंत्र्यसैनिक वसंतराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत पोलीस विभागाने यावेळी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
पारतंत्र्यातही तिरंगा ध्वज डौलाने फडकवणार्या आणि 4 दिवस स्वातंत्र्य उपभोगणार्या क्रांतिभूमी सोलापूर नगरीत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नवा इतिहास घडला. महापालिकेच्या आवारात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उभारण्यात आलेल्या तब्बल शंभर फुटी उंच स्तंभावर दिमाखात ध्वजारोहण करण्यात आले. शानदार असा सोहळा देशभक्तीमय वातावरणात पार पडला. याची देही याची डोळा उपस्थितांनी हा स्फूर्तीदायी सोहळा पाहिला. अनेकांनी आपल्या मोबाईल मध्ये हा क्षण टिपला.