औरंगाबाद | प्रतिनिधी
पैठण येथील नाथसागरच्या एकूण दरवाजांपैकी सर्वच्या सर्व 27 दरवाजे उघडण्यात आले आहेत. धरणातून गोदावरी नदी पत्रात 94 हजार 320 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे….
सर्व दरवाजे 2 ते 4 फुटाने उघडून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरणाचे 10 ते 27 दरवाजे चार फुटाने उघडण्यात आले. तर 1 ते 9 दरवाजे दोन फुटांनी उघडण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
नाथसागरात यंदा सलग दुसऱ्यांदा शंभर टक्क्य़ांपर्यंत पाणीसाठा झालेला आहे. गतवर्षी १५ ऑगस्टच्या दरम्यान काही दरवाजे उघडण्यात आले होते.
यंदा ६ सप्टेंबर रोजी रात्री नाथसागराचा पाणीसाठा ९९ टक्क्य़ांपर्यंत आल्याने आठ दरवाजातून विसर्ग सुरू झाला होता.
७ सप्टेंबर रोजी नाथसागराचे १८ दरवाजे अर्धा फूट उंचीने उघडण्यात आले होते. त्यातून १३ हजारांवर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाला होता. यानंतर आज सर्वच्या सर्व दरवाजे उघडण्यात आले असून गोदावरीला पूर आला आहे. नदीकाठी सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.