अयोध्या :
हा आनंदाचा क्षण आहे. एक संकल्प केला होता, तो संकल्प आज पूर्ण झाला. आता या जागेवर मंदिर बनणार आहे, मात्र आपल्याला आपल्या मनात मंदिराचं निर्माण करावे लागेल. राम मंदिराच्या उभारणीचे काम सर्वांना वाटून देण्यात आले आहे. परंतु आपल्याला आपल्या मनात अयोध्या सजवायची आहे. या ठिकाणी जसे मंदिर बनेल तसे मनातील अयोध्या बनायला हवी. हे मंदिर उभे राहण्यापूर्वी मनातील मंदिर उभे राहायला पाहिजे. हे मंदिर पूर्ण होण्याआधी आपल्याला आपले मनमंदिर उभे करावे लागणार आहे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या भूमिपुजनाच्या वेळी सांगितले . या वेळी त्यांनी विश्व हिंदु परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक सिंघल यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मोहन भागवत म्हणाले, आज अनेक जण इथे येऊ इच्छित होते. मात्र ते येऊ शकत नाहीत. आडवाणीजी देखील हा सोहळा पाहत आहेत. गेल्या ३० वर्षांच्या कठीण संघर्षाचे फळ आज मिळाले आहे. एवढ्या वर्षांचा संघर्ष कधीही विसरता येणार नाही, असे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.