Sunday, April 28, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यातील दहा लाख निराधारांना आधार; लाभार्थ्यांना 'इतक्या' कोटी रुपयाचे अनुदान

राज्यातील दहा लाख निराधारांना आधार; लाभार्थ्यांना ‘इतक्या’ कोटी रुपयाचे अनुदान

नाशिक | प्रतिनिधी

संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन या दोन्हीही योजनांमधून लाभार्थ्यांना दरमहा वेळेवर अनुदान मिळावे या साठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत ५५६ कोटी तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ९४० कोटी असा एकूण १४९६ कोटी इतका निधी सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे.

- Advertisement -

लाभार्थ्यांना तो तात्काळ वाटप करावा अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव, सुमंत भांगे यांचेकडून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. राज्यातील निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त, विधवा, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेची मासिक रक्कम गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामध्ये विशेषत्वाने ग्रामीण भागातील लाभार्थी हेाते. त्यांचा उदरनिर्वाह केवळ संजय गांधी निराधार योजनेच्या आधारावर आहे.

‘राज्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. सध्या सण-उत्सव प्रारंभ झाले आहेत. अशात सर्वत्र उत्साह असताना या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीच्या वाट्याला मात्र प्रतीक्षा होती.

संजय गांधी निराधार अनुदान योजनेतंर्गत किमान १८ ते ६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा, घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी, ३५ वर्षावरील अविवाहीत स्री, तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.

या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये २१,०००/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे. या योजनेखाली पात्र लाभार्थ्याना रुपये १५००/- दरमहा इतके अर्थसहाय्य दिले जाते. तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेमधून दारिद्रय रेषेखालील यादीच्या कुटूंबात नांव असलेल्या व रु.२१,०००/- पेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या ६५ व ६५ वर्षावरील पात्र लाभार्थ्यास दरमहा रु. १५००/- अर्थसहाय्य देण्यात येते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या