<p><strong>मुंबई | प्रतिनिधी </strong></p><p>जागतिक औद्योगिक क्षेत्राची गरज भागवू शकतील असे कुशल मनुष्यबळ महाराष्ट्रातून उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) अद्ययावतीकरण करण्यात येणार आहे...</p> .<p>यासाठी साधारण अकरा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून यापैकी ८८ टक्के निधी उद्योग क्षेत्राकडून तर राज्य शासनाकडून १२ टक्के निधी उपलब्ध करण्यात येणार आहे.</p><p>राज्यातील युवकांच्या कौशल्यवृद्धीसाठी हा महत्वकांक्षी प्रकल्प राबवण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.</p><p>राज्यातील प्रशिक्षण संस्थांच्या अद्ययावतीकरणासंदर्भात मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या विशेष बैठकीत यासंदर्भात चर्चा करण्यात आली. या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.</p><p>सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीला कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, पुण्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. राजेंद्र जगदाळे आदींसह वित्त व कौशल्य विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.</p><p>औद्योगिक क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, त्या तंत्रज्ञानाधारिक उद्योगांची गरज पूर्ण करण्यासाठी राज्यातील आयटीआय संस्थांचे अद्ययावतीकरण करणे गरजेचे होते. सद्यस्थितीत राज्यात ४१९ शासकीय आयटीआय, ५३ तंत्रशिक्षण शाळा व सुमारे ५०० खाजगी आयटीआय आहेत.</p><p>या संस्थांमधील अनेक अभ्यासक्रम कालबाह्य झाले असून ते बदलून नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. सुरुवातीला शासकीय संस्थांमध्ये अद्ययावतीकरणाची योजना राबवण्यात येणार आहे.</p>