जळगाव –
राष्ट्रीय महामार्ग क्र.६ म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला आहे. महामार्गावर अनेकठिकाणी पडलेले जीवघेणे खड्डे बुजण्यासाठी नशिराबाद ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थांनी अनेकवेळा संबंधित विभागास निवेदने दिलीत.
या निवेदनांचा काही उपयोग न झाल्याने भारतीय राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरण विभागाला दि.२२/११/२०१९, २९/११/२०१९, ११/१२/२०१९, २८/०१/२०२० या तारखांना खड्डे दुरुस्तीबाबत निवेदन देऊन खड्यांकडे प्रसारमाध्यमातून लक्ष वेधले, मात्र निर्ढावलेल्या व सुस्त नहीच्या प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेतली नाही.
अखेर मृत ठरल्यागत असलेल्या ‘ नही ‘ च्या निषेधार्थ नशिराबादकरांना आंदोलनाचा पवित्रा हाती घ्यावा लागला. दि.२८ जानेवारीला ‘ नही ‘ ला प्रतिकात्मक बोळवण देऊन निषेध नोंदविला.
किमान आता तरी ‘ नही ‘ विभाग रस्त्यांच्या दुरावस्थेची दखल घेईल अशी अपेक्षा होती. मात्र दहा दिवसांच्या कालावधीत खड्यांची समस्या जैसे थेच आहे.
त्यामुळे २८ जानेवारी प्रतिकात्मक बोळवण दिल्यावर आज ६ फेब्रुवारी रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुस्त ‘ नही ‘ विभागाची प्रतिकात्मक दशक्रिया विधी केला.
जिल्हाधिकाऱ्यांनीच दखल घ्यावी दरम्यान आपणच या खड्यांची योग्य ती दखल घेऊन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन तात्काळ खड्डे बुजवून, प्रवाशांचे जीवन सुखकर व सुरक्षित करावी अशी मागणी आंदोलन कर्त्यांनी केली.
माजी मंत्र्यांची उपस्थिती
या आंदोलनात माजी मंत्री गुलाबराव देवकर, जि.प.उपाध्यक्ष लालचंद पाटील, सरपंच विकास पाटील उपसरपंच कितीकांत चौबे, माजी सरपंच पंकज महाजन ,शिवसेनेचे विकास धनगर, चेतन बऱ्हाटे, सय्यद बरकत आली, नवाब सर आदींसह मोठ्या संख्येने नशिराबादचे ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित होते.