अंगणात आंघोळीचे पाणी गेल्याचे कारण, महिलेची प्रकृती गंभीर
धुळे – प्रतिनिधी
अंगणात लहान मुलाच्या अंघोळीचे पाणी आल्याने १२ जणांनी महिलेला पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली असुन महिलेच्या पतीला देखील लोखंडी रॉडने मारहाण केल्याने पती-पत्नीला धुळे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदर घटना नवेभामपुर येथे घडली आहे. फिर्यादी अश्विनी सुभाष कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, दि. ९ रोजी ११:३० वाजेच्या सुमारास मुलगा कल्पेश वय दोन वर्षे याची अंगणात अंघोळ घालत होती. त्यावेळी अंघोळीचे पाणी शेजारी राहणारे प्रल्हाद संपत कोळी यांच्या अंगणात गेले त्यावरून प्रल्हाद कोळी व त्यांचे परिवारातील लोक भांडण करण्यास धावुन आले.
फिर्यादीचे पती सुभाष साहेबराव कोळी हे आले त्यावेळी प्रल्हाद संपत कोळी, सरलाबाई रमेश कोळी, आक्का बाई कोळी, योगिता बाई रमेश कोळी, राकेश रमेश कोळी, अनिल कांतीलाल कोळी, धनराज प्रल्हाद कोळी, निर्मलबाई प्रल्हाद कोळी, आधार रोहिदास कोळी, निर्मलबाई प्रल्हाद कोळी, राहुल कोळी, अंगुबाई कांतीलाल कोळी, क्रांतीबाई कांतीलाल कोळी हे हातात काठ्या, सळई, दगड विटा घेवुन धावुन आले व वाईट वाईट शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देऊन फिर्यादीच्या पतीला राकेश रमेश कोळी याने लोखंडी रॉडने डोक्यावर मारले व आधार रोहीदास कोळी याने काठीने मारहाण केली.
तसेच फिर्यादी पत्नी- पतीला मारहाण केली. त्यावेळी सरलाबाई रमेश कोळी व आकबाई कोळी यांनी फिर्यादीला धरून ठेवुन योगिताबाई कोळी हिने घरातुन बाटलीत पेट्रोल आणुन अंगावर ओतुन पेटवुन दिले. गंभीर अवस्थेत फिर्यादी व फिर्यादीचे पतीला शिरपूर उपजिल्हा रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र पुढील उपचारासाठी दोघांना धुळे येथे उपचारासाठी रवाना करण्यात आले.
संशयितांना विरूध्द शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे ३०७,१४३,१४७,१४८,१४९,
३२३,५०४,५०६,१८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपनिरीक्षक एस.बी.आहेर हे करीत आहेत.