Friday, May 10, 2024
Homeधुळेधुळे : शहरातील आणखी तीन जण करोना मुक्त

धुळे : शहरातील आणखी तीन जण करोना मुक्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून दिला डिस्चार्ज

धुळे – प्रतिनिधी

- Advertisement -

कोरोना विषाणूवर (COVID 19) मात करीत धुळे जिल्ह्यातील आणखी तीन रुग्ण आज सायंकाळी आपापल्या घरी परतले. त्यात धुळे शहरातील एका महिलेसह दोन पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णांना श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपाययोजना केल्या जात आहेत. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय हे डेडिकेटड कोविड हॉस्पिटल घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी अतिदक्षता विभागही कार्यान्वित केला आहे.

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचे आतापर्यंत 51 रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी सहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोन रुग्णांवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. त्यापैकी आतापर्यंत 14 रुग्ण कोरोना मुक्त होऊन घरी परतले आहेत.

या विभागात दाखल तीन रुग्णांना 14 दिवस पूर्ण झाले. या कालावधीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यामुळे त्यांची काल व आज कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचे अहवाल आज निगेटिव्ह आले. त्यामुळे या तीन जणांना आज सायंकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

यावेळी आमदार डॉ. फारुक शाह, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नागसेन रामराजे, नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी, विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ, डॉ. निर्मल रवंदळे, डॉ. अरुण मोरे, डॉ. अनंत बोर्डे, डॉ. राजेश सुभेदार, डॉ. परवेज मुजावर, डॉ. रामानंद, डॉ. नीता हटकर, अधिसेविका अरुणा भराडे, नागेश सावळे, गिरीश चौधरी आदी उपस्थित होते.

धुळे जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास, महसूल, बंदरे, खार विकास जमिनी, विशेष साहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्याचाच परिणाम म्हणून आज आणखी तीन रुग्ण कोरोना मुक्त होवून घरी परतले आहेत.

असे असले तरी नागरिकांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी बाळगावी. शारीरिक अंतर ठेवावे. नागरिकांनी घरातच सुरक्षित राहावे. अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह जिल्हाधिकारी श्री. यादव, पोलिस अधीक्षक श्री. पंडित यांनी केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या